पान:साथ (Sath).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असतं. असहय झालं तरच ते मोडायचा विचार करायचा किंवा नवऱ्यानं हाकलूनच दिलं तर ! पण कुणाला काय असहय वाटेल ते कसं ठरवायचं ?
  आणि ह्याशिवायसुद्धा आईकडे जाऊन राहणं ही शक्य कोटीतली गोष्ट नव्हतीच. निशा लग्न होऊन गेलेली होती, पण आता घरात संजय, त्याची बायको आणि त्यांची दोन मुलं होती. नव्या परिस्थितीचे नवे ताणतणाव होते. संजय आणि त्याची बायको दोघंही नोकऱ्या करीत होते. एखादी मोलकरीण ठेवण्याइतपत पगार दोघांचा मिळून सहज होता. पण आईचं म्हणणं, एवढया थोड्या कामासाठी मोलकरीण कशाला ? भांड्या-धुण्याला बाई होतीच. मग बाकीची कामं आपली आपण केली तर कुठं बिघडलं? पण आईचं आता वय झालं होतं. तिचे सांधे दुखत, तिची दृष्टी क्षीण झाली होती. तेव्हा आपली आपण कामं करणं याचा अर्थ संजयच्या बायकोनं कामं करणं असाच व्हायचा. अर्थातच जादा काम पडल्यामुळे ती अखंड चिडचिड करायची आणि घरात दोन बायकांच्या सदैव कुरबुरी चालायच्या.
 एकदा ज्योती संजयला म्हणाली होती, " तू काहीतरी बोलत का नाहीस? तू ठामपणे तसं म्हटलंस तर आई नक्की पूर्णवेळ कामाची बाई ठेवू देईल."
 "हं ! आणि मग पदोपदी मला त्याबद्दल ऐकवील."
 " मग हे जे चाललंय ते त्यापेक्षा बरं आहे का ?"
  त्यानं नुसते खांदे उडवले आणि ज्योती गप्प बसली. आपण त्यांच्या घरात नाक खुपसणं संजयला आवडत नाही, हे तिला कळून चुकलं होतं. इतकं तणावाचं आणि विसंवादाचं वातावरण तो कसं सहन करू शकतो, हे तिला समजत नसे. तिला स्वतःला तिथे इतकं उदास वाटायचं, की ती सहसा आईकडे रहायला जातच नसे.
 एकदा निशा तिला म्हणाली होती, " ताई, तू लकी आहेस. सुनेला शत्रूसारखं वागवणाऱ्या सासरच्या माणसांना तुला कधी तोंड द्यावं लागलं नाही." मग तिला अपराध्यासारखं वाटलं की,

४० : साथ