उरल्यासुरल्या तुराट्यांचा खराटा करून त्यानंच विठू घर झाडायचा. मग जमीन उखणायची. कामावरून येताना तो तांदूळ, मीठ घेऊन यायचा. कधी डाळ, कधीतरी एखादी भाजी आणायचा पण भाजी आणली की तेल, मसालाही आणावा लागायचा. उगाच पैसे खर्च व्हायचे. म्हणून मग तो महिन्यातून एखाद्या वेळीच भाजी आणायचा. कामावरून आल्यावर तो पाण्याचा माठ भरून आणायचा. मग तुराट्याच्या बारीक काटक्या करून त्या चुलीत टाकायचा. त्याखाली कागदाचा एखादा तुकडा सरकावून त्याने चूल पेटवायचा. त्या चुलीवर भात शिजवायचा. घरात वीज नव्हतीच. घासलेट आणायला पैसे लागतात. घासलेट नाही म्हणून दिवा नाही. मग अंधार पडायच्या आत जेवून अंगणातल्या बाजल्यावर दात कोरत विठू एकटाच बसायचा. रोज कामाला जाताना तो पैसे पुरून ठेवालेल्या जागेकडे नीट न्याहळून बघून मगच जायचा. त्याच्या अंगावर फाटकी पैरण आणि खाकी अर्धी विजार असायची. ती सहा सहा महिने धुवायचा नाही. वाढलेलं केसांचं टोपलं त्याला तेल, कंगवा कधी लागला होता की नाही कुणास ठाऊक. तो कुणाशी नीट बोलायचा नाही. पोरांच्यावर तर नेहमीच खेकसायचा. मग पोरं त्याला चिडवायची. मागे पळायची. विठू मग दगडं घेऊन मुलांच्या अंगावर धावून जायचा. विठूकडे पाहून कुत्री पण भुंकायची. शेतावर मजूरीनं जायचा, तिथली लोकं विठूला म्हणायची,
" अरे बाबा नदीवर जा निर्मळवानी अंघोळ कर, कपडे धू."
तो म्हणायचा,
"मला येळ कुठं असतोय. पहाटंपस्नं वाळूच्या ट्रकवर जातू, वाळू भरायला. घरी जाऊन भात शिजवून खातू, मग शेतात येतूया. कवाशी जायचं अंघोळीला न् कपडे धुवायला? मरू दे."
नंतर लोकांनी सांगायचं सोडून दिलं. त्याच्या हेकटपणाकडं मग सगळेच दुर्लक्ष करायचे. दुपारी जेवायच्या सुट्टीत त्याच्याकडे जेवण नसायचं. तेव्हा त्याच्याबरोबर काम करणारे लोक त्याला आपल्यातील अर्धी चतकोर भाकरी कधीतरी खायला द्यायचे. तेव्हा त्याचा फार आनंद व्हायचा. मालक त्याला म्हणायचे,
"विठू किती आबाळ करतोस सोताची. आता लगीन कर."
"कोण करील माझ्यासंग लगीन ?” विठू लाजून म्हणायचा.
"तुझं आयबाप कुठं असत्यातं ?"
"वारले ते. "
" तू एवढं पैसे कमावतोस. नीट रहावं, खावं प्यावं. न्हायतर काय उपेग त्या