केसरीचे दक्ष आणि साक्षेपी संपादक श्री. करंदीकर यांचें संपन्न लिखाण श्री. तात्यासाहेब करंदीकर हे केसरी संस्थेत दि. १२ मार्च १९१२ ला प्रविष्ट झाले. तीन वर्षांनी म्हणजे एप्रिल १९१५ मध्ये उपसंपादक म्हणून त्यांची कायम नेमणूक झाली. मुख्य संपादक म्हणून त्यांची नेमणूक १९३१ च्या जानेवारीत झाली. एक वर्षानें म्हणजे १९३२ च्या जानेवारीत त्यांना कायदेभंगाच्या चळवळीत दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. १९३३ च्या ऑक्टोबरमध्ये ते मुटून आल्यावर पुनः केसरी त्यांच्या नांवावर झाला तो १९४६ च्या ऑगस्टपर्यंत होता. दोन्ही खंड मिळून १४ वर्षे केसरीचे ते मुख्य संपादक होते. तथापि श्री. तात्यासाहेब केळकर यांनी ट्रस्टीशिप सोडल्यावर श्री. करंदीकर हे पूर्ण मुखत्यार झाले. तेव्हांपासून युद्ध- कालांत वृत्तपत्रांचा आकार व किंमत यांवर नियंत्रण येईपर्यंत १९३७ ते १९४६ जुलै- अखेर केसरीचा खप १५ हजारांपासून ३० हजारांपर्यंत गेला. खपांत झपाट्यानें झालेली ही वाढ श्री. करंदीकरांच्या कुशल संपादकत्वाचा प्रत्यक्ष पुरावाच होय. सप्टेंबर १९१० मध्यें ते समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पुरा करण्यासाठी पुण्यास आले. तेव्हांपासून आजवर म्हणजे ४० वर्षे केसरीशी त्यांचा संबंध आला. त्यांच्या निवडक लेखांचा हा संग्रह त्यांच्या वयाला ७५ वर्षे पुरीं झाल्याच्या निमित्ताने लोकांपुढे येत आहे. यावरूनच टिळक, केळकर, खाडिलकर यांच्याप्रमाणेच करंदीकरांनींहि वाङ्मयांत ग्रंथख्याने जतन करून ठेवण्यासारखें लेखन केसरीतून केलें ही गोष्ट स्पष्ट होत आहे. लोकमान्य टिळकांच्या केसरीतील लेखसंग्रहाच्या प्रसिद्धीपूर्वी आर्यभूषण छापखान्यामार्फत केसरीतील निवडक निबंध दोन भागांत प्रसिद्ध झाले होते. यांत आगरकर, चिपळूणकर, वासुदेवराव केळकर, तात्यासाहेब केळकर, देवधर आणि टिळक यांचे लेख असले पाहिजेत अशी कल्पना आहे. नेमके कोणते कोणाचे हे समजण्यास आज साधन नाहीं. एवढे मात्र खरें की, १८८१ पासून १९४६ पर्यंत केसरीच्या थोर संपादकांच्या लिखाणांतून आलेले महत्त्वाचे लेख पुस्तकरूपानें छापण्याची परंपरा अव्याहत चालली असे म्हणावें लागेल. हिंदुस्थानांतील वृत्तपत्रांच्या संबंधांत तरी अशा प्रकारचें उदाहरण असामान्य असे म्हटले पाहिजे. एका वृत्तपत्राला लागोपाठ मौलिक लिखाण लिहिणाऱ्या इतक्या संपादकांची सांखळी किंवा परंपरा अखंडितपणे लाभावी ही गोष्ट केसरी पत्राच्या इतर अनेक वैशिष्टयांत भरच टाकणारी आहे. केसरीच्या संपादनाचे मर्म १९४१ मध्ये केसरीचीं साठ वर्षे पुरी झाली, त्या वेळी श्री. तात्यासाहेब करंदीकर यांनी केसरींत जो विस्तृत अग्रलेख लिहिला त्यामध्यें केसरीची परंपरा आणि तदनुसार कर्तव्यबुद्धीनें काम करणारा संपादक यांचा दृष्टिकोन अनेकांगांनी