Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(३)
कारभारी पक्षाच्या हकीकती सुद्धा.

की, "वाडयांत आनंदीबाईसाहेब यांचा फितूर दिसतो. फितुरांत तुळाजी पवार व दोन जमादार आहेत." त्याचा अगोदर बंदोबस्त करावा. म्हणोन नारायणराव यांस विनंती केली. तेव्हां बोलिले की, "बंदोबस्त करूं. त्यांनी काय करावयाचे आहे.?" हे वर्तमान फितुराचे सखारामबापू व त्रिंबकरावमामा व नानाफडणीस व हरीपंत फडके यांनी [ ऐकून ] नारायणराव यांस विनंती केली की, "वाड्यांत फितूरच दिसतो. आमचे स्वामी ऐकत नाहीत. बाबाजी जें करतील तें प्रमाण. परंतु आधी बंदोबस्त करावा." इतके सुचविले असतां दोघांनी[] मनावर घेतले नाहीं. पुढे आठ चार दिवशीं मारणार तो सगळे गारदी दरवाज्या बाहेर येऊन बोलले की, आमचे तरफेचा[] सर्व हिशोब करावा. आम्हांस चाकरी करावयाची नाहीं." अशी बोलणी घातली. मग चापाजी टिळेकर यांणी पुन्हा विनंती केली की, गारदी लोक सर्व एकेठिकाणी जमले असा अर्थ नाहीं. परंतु फितूर खास आहे. याची उपेक्षा करूं नये. याचा बंदोबस्त करावा. पुढे ज्या दिवशी मारणार ते दिवशी प्रातःकाळी स्वारी नारायणराव साहेब यांची पर्वतीस गेली होती, तेथें स्नानसंध्या भोजन वगैरे करून स्वारी गणेशखिंडीत कुलाबकर राघोजी आंग्रे सरखेल त्यांस पूर्वापार सामोरे जावयाचा शिरस्ता म्हणोन गेले. तों तेथे आंग्रे यांची भेट जहाल्यानंतर श्रीमंत व आंग्रे हे लकडी पुलापर्यंत आले. तेथें चापाजी टिळेकर याना विनंती केली की, "आज स्वारी बाहेर आली. तर आपणांस ठार वाडयांत मारण्याचा बेत केला आहे, सबब स्वारी पर्वतीस जावी, आणि वाड्यांत बंदोबस्त करावा. नंतर वाड्यांत स्वारी जावी. हे नीट असे." इतके सांगितले असतां मनावर घेतले नाहीं. "तिसरे प्रहरीं बंदोबस्त करूं" म्हणोन बोलले. स्वारी आली. आंग्रे आपले वाडघांत गेले.

 दोन प्रहरीं दिवाणखान्यांत जाऊन झोपाळ्यावर बसले आणि विडा खाऊं लागले. तो जमादार यांणी गारदी शिपाई वाड्यांत घेऊन दरवाजे लाविले. आणि जिकडे तिकडे "दीन दीन" केली. हे वर्तमान नारायणराव साहेब यांजला लागतांच घाबरे जाहाले. आतां कसे करावे? चापाजी टिळेकर यांणी विनंती केली कीं, "या मागे मी आपल्यास आजपर्यंत विनंती करितां दमलो. परंतु स्वामींनी मानिले नाही. अजून तरि विनंति करितो ती ऐकावी. वाड्यांत भुयार आहे. भुयारांतून माझा हात धरून चलावें. मी आपल्यास बाहेर काढितो. मग श्रीमंत नारायणरावसाहेब बोलले की, "भुयारांत शिरावयास आम्हांस धीर होत नाहीं. दादासाहेब यांचा फितूर आहे. त्यांजकडेसच जाऊं. म्हणजे


  1. दोघांनी= श्रीमंत व बर्वे
  2. तरफेचा= तलबेचा? राहिलेला पंगार.