Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(२)
श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.

जहालें कीं, नारायणराव साहेब राज्य करितो हें ठीक नाहीं. सबब नारायणराव साहेब यास ठार मारण्याची मसलत करावी. सबब खरगसिंग व सुमेरसिंग जमादार परदेशी सरकारचे वाड्यांत पांच हजार गारदी चौकी पहाऱ्यांत श्रीमंततांपाशी होते व खिजमतगार हुजरे तुळाजी पंवार व चापाजी टिळेकर दोनशे हुजऱ्यांत मुख्य होते, त्यां पैकीं पवार व दोन जमादार यांस बोलावून आणून विचारलें कीं, "तुम्हांस मनसोबा सांगतें. बाहेर बातमी फुटूं देऊ नये. तुम्हांस बक्षीस जे मागाल तें देईन. तुमची खबरदारी समजली पाहिजे मग मी सांगेन." त्याणी विनंती केली की, आम्ही अगोदर काय सांगावें? आपले मनांत काय आहे ते समजले पाहिजे. त्या सारखी विनंती करूं. मग आणभाष, बेलभंडार घेऊन सांगितले की, नारायणराव साहेब यांस मारावयाचा मनसोबा आहे. मग खरगसिंग व सुमेरसिंग व तुळाजी पवार यांची नांवें घातली. तिघांनी विनंती केली की, आम्हांस दादासाहेब यांची स्वदस्तुरची याद मारावा अशी आणून द्यावी. म्हणजे आम्ही त्याची तजवीज करूं. मग आनंदी बाईंनी याद लिहिली. दोघे जमादार व तुळाजी पवार यांची नांवें घातली. एके दिवशीं याद घेऊन देवघरांत दादासाहेब ध्यानस्थ बसले होते, त्यांची स्नान संध्या तपश्चर्या विसर्जन होतांच याद पुढे ठेविली. ती दादासाहेब यांनी वाचून पाहून बोलले की, तूं काय म्हणतेस? आनंदी बाई यांजला सांगितले की, तो परकी नाहीं. प्रत्यक्ष पुतण्या! तो पुत्राप्रमाणेच आहे. कांहीं गैर रीतीची वागणूक होईल आणि राज्यास अपाय होत असल्यास बंदोबस्त करावा. परंतु मारावा अशी अक्षरें कदापि घालणार नाही. या खेरीज कोणती गोष्ट असल्यास बोलावी. तुझे मनांत राज्य करावे असे असल्यास धरावें अशी अक्षरें घालितों. मग आनंदी बाई बोलली की, आडवें पोर आल्यास त्यास कापून टाकावे लागतें. अशा गोष्टी रागे भरून बोलली. मग धरावा अशी अक्षरे बाईचे आग्रहास्तव घातली. मग ती याद आनंदी बाई याणी घेऊन देवघरा बाहेर वाचली. कलमदान बराबरच होतें. एक अक्षर फिरवावयाचे [ होतें.] 'ध' चा 'मा' केला. 'मारावा' अशी आक्षरें स्पष्ट जहाली. ती याद जमादार व पंवार यांजपाशी दिली. आणि सांगितले की, "अक्षरें खुद्द खाशांचे हातची आहेत." मग ती याद घेऊन मसलतीस लागले.
 पुढे नारायणराव कारभार करूं लागल्यास सहा महिने झाले. अवघा कारभार नऊ महिने जहाला. मग जमादार व पवार यांणी झाडून वाड्यांत फितूर केला. पांच हजार गारदी लोक चौकी पाहाऱ्याचे तामाम सारे परदेशी होते. तो फितूर होतांच हे वर्तमान चापाजी टिळेकर व दुसरे आणखी हुजरे यांस समजलें