Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३ )
कारभारी पक्षाच्या हकीकती सुद्धां.

शंखध्वनी केली. मग तव्यावरून खाली उतरले. आणि दुखणे लागले. तसेच शिकस्त स्वारी बराबर होते.
 तो इकडे सवाई माधवराव यांस बारा दिवस जहाले. पाळण्यांत घातले. नांव सवाई माधवराव ठेविलें. आणि गादीवर बसविलें. तो साताऱ्याहून पत्रे व वस्त्रे आली ती पुढे ठेविली. पार्वतीबाई काकू यांनी सवाईचे शिक्के, कटारी, सनदा वगैरे ठोकिल्या. सनदा व साखरा महालों महाली सरदार व नबाब मोंगल व टिपू सुलतान [सुद्धां] सर्वांस पाठविल्या. इकडे दादासाहेब यांस साखरा पाठविल्या. मनांत खुषी जहाली.
 दुसरे दिवशीं बापू व हरीपंततात्या फौजे सुद्धां तयार जहाले. तिकडे नबाब यांस सूचना केली कीं, तुम्ही तिकडोन यावें आम्ही इकडोन येतो. आणि मध्येच दादासाहेब यांस धरावें. अशी बातमी दादासाहेब यांस समजली. आणि बातमीदार यानेंही सांगितली. त्याजवरून दादासाहेब ज्या मुक्कामों होते तेथून पळोन गेले. आणि बापू व हरीपंत तात्या पाठीस लागले. ते पळून नाशिकास गेले. निजामअल्ली व मोंगल पुढे नाशिकावर सामोरे गेले. दादासाहेब धोडपच्या किल्यावर गेले. पुढे बापू व हरीपंत येऊन पोचले. आणि किल्यांत फितूर करून दादा साहेब यांस धरिलें.१२[] मग नबाब यांच्या व सखाराम बापू व हरीपंत तात्या यांच्या भेटी जहाल्या. नबाब यांचा इतमाम बहुत राखला. व त्याच्या जवळ खर्चास राहिले नाही कारणाने मनास आणून जागीर पासष्ट लक्षांची व दौलताबादचा१३[] किल्ला दिल्हा. आणि मेजवानी केली. नंतर नबाब यांस निरोप दिल्हा. मग दादासाहेब यांस घेऊन पुण्यास आले. आणि वाड्यांत बंदोबस्त करून ठेविलें. नंतर बापू व हरीपंत तात्या पुरंधरास गेले आणि कारभार झाडून पुरंधरासच चालू लागला.
 पुढे सहा महिन्यांनी दादासाहेब फितूर करून निघाले. फौज घेऊन हरीपंत तात्या पाठीस लागले. दादासाहेब हे पळत पळत बऱ्हाणपुरास गेले. तो तेथेंही पाठीस लागले. दादासाहेब हे उज्जनीस गेले. तेथे पवार यांचे गांव धारा म्हणोन शहर आहे. तेथे आनंदीबाई प्रसूत जहाली. बाजीराव साहेब यांचा जन्म जहाला. मग बारा दिवस जहाल्यानंतर तेथून कूच करून सुरतेस आले. तेथें पंधरा दिवस मुक्काम केला. तो इतक्यांत हरीपंत तात्यांनी फौजेत फितूर केला कीं, दादासाहेब यांस धरावें. तो दादासाहेब व आनंदीबाई साहेब व अमृतराव व बाजीराव साहेब सुद्धां निघून गलबतांत बसून मुंबईस गेले. तो


  1. धोडपच्या किल्यांत माधवरावाच्या वेळी दादांस धरिलें होते.
  2. भाऊसाहेबांनी उदगीरची लढाई मारून घेतलेला मुलुख.