Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२ )
श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.

पुरंदरास बंड केले" तेव्हां मामांनी विनंती केली की, "ते असे करतील असे मात्रागमनपणा मला काय माहीत? त्यांच्या शरीरास समाधान नाही म्हणोन निरोप देवविले. आणि ते पळोन गेले. काय चिंता आहे? आम्ही आपले जवळ आहोत. आपण काही काळजी करूं नये." अशा गोष्टी सांगोन समाधान केलें. मग दादासाहेब म्हणाले की, आम्ही माघारे फिरतों. तेव्हां मामांनी उत्तर केले की, "गलीम उरावर आला आहे. त्याचे पारपत्य करूं. मग मुत्सद्दी यांणी घरफितूर केला तो पाहून घेऊं. परंतु परशत्रूचे घरांत राज्य गेले तर मग कठीण." याप्रमाणे दादासाहेब यांस सांगितले. तेथून कूच करून काष्टीतापळीचे मुक्कामी गेले. तेथे शहास गुंतविलें. मागें इकडे मुत्सद्दी पुरंदरास गेले होते त्यांनी विचार केला की, "गंगाबाईस कन्या जहाली तर कसे करावे?" असे बापू बोलले. तेव्हां नाना बोलले की, "चितपावनाच्या बायका, यांच्या बरोबरीच्या गरोदर, नऊ महिन्यापर्यंत किल्यावर ठेवाव्या" याप्रमाणे बाया किल्यावर दहा आणोन ठेविल्या. परंतु हें वर्तमान दादासाहेब यांस कळले तर कसें करावे ? प्रत्यक्ष अवतार जहाला तत्रापि संशय घेतील. त्यांस खरें वाटणार नाहीं. म्हणोन दादासाहेब यांची मुलगी दुर्गाबाई, तिजला बारामतीकरांकडे दिली आहे, तीस आणोन किल्यावर ठेवावी. जेव्हां गंगाबाई प्रसूत होऊं लागतील तेव्हां खोलीत नेऊन प्रत्यक्ष दाखवावें, म्हणजे दादासाहेब यांची खात्री होईल. कदाचित मुलगी जहाली तर बदलाबदली करीतच आहो. मग कसे होईल ते पाहूं." असे पार्वतीबाई काकू यांनी सांगितले. मग मसलत चार महिने लांबविली. पुढे गंगाबाईसाहेब नव मास भरल्यावर प्रसूत जहाल. मुलगा दृष्टीस पडला, त्यावेळेस दुर्गाबाई यास पार्वतीबाई काकूसाहेब यांणीं खोलीत आणून दुर्गाबाई यांस आणून बसविलें. तो तिच्या देखत अवतार जहाला.
 आतां पुरंदरा खालची फौज व तिकडून मोंगल असे येऊन दादासाहेब यांस धरावा याची चिठ्ठी अशा फितुराची त्रिंबकराव यांस पाठविली. ती चिठ्ठी दादासाहेब यांस सांपडली, मग मामासाहेब यांस बोलावून पुसलें कीं, "तुमचें पारिपत्य काय करावे," त्यांणी उत्तर केले की, "स्वामींस चिठ्ठी फितुराची सांपडली त्यापेक्षां मोंगलाच्या फितुरांत नाहीं असे बोलल्यास सत्य कसें वाटेल? मर्जीस येईल तसे पारिपत्य करावे. एक मामा मेला तरी चिंता काय आहे? मागें मुत्सद्दी स्वामीसेवेत अकराजण आहेत. मामापेक्षां चांगले आहेत." दादासाहेब यांस परम राग आला. आणि तवे तापत घातले. ते लाल करून मामांस वर उभे केले. नंतर मामांचे पायां खालून बहुत धूर निघू लागला. मग मामांनी