________________
अंक ४ था. प्रवेश ४ था. स्थळ-देहू येथील विठोबाचे मंदिर. (तुकाराम प्रवेश करतो.) तुकाराम-(एकीकडे ) मन म्हणजे काय ? कल्पनेची केवळ मूर्ति. या मूर्तीचे संगतीने नानाप्रकारचे जन्म प्राप्त होतात. या मनाचा संचार सर्वत्र आहे. याला भ्रमण करण्यास दहाही दिशा पुरत नाहीत. आकाश आणि सप्तपाताळे ही पुरत नाहीत. एवढी याची व्यापकता असून आपण याला क्षणभर धरूं म्हटलं तर सांपडणार नाही. मर्कट कधी समाधी लावील काय ? तसे हे मन आहे. निश्चयाला हटकन ढांसळून टाकणारे, धैर्याला नष्ट करणारें, विवेकाला भ्रष्ट करणारे, जाऊ नये तेथें हटकून जाणारें, खाऊं नये ते खाणारें, पिऊं नये तें मुद्दाम पिणारे, बोलूं नये तें बकणारें, करूं नये ते जाणूनबुजून करणारे, सर्व इंद्रियांना चेतना उत्पन्न करणारे, आशा, तृष्णा, कल्पना, काम, क्रोध यांचें ठाणे जागृत ठेवणारे, आणि शुद्ध बुद्धीची राखरांगोळी करणारे असें हें अनिवार आहे. गिरिकपाटांत एकांती आसन ठोकून ऋषिजन म्हणतात आम्ही मनोनिग्रहीं सावधान आहों, पण हे मन त्यांना केव्हांच ठकवून निघून जात आहे. मनाचे आकलन करण्याकरितां कितीएक अन्नाचा त्याग करून बसले, पण मनाने त्यांना रात्रंदिवस जागृतींत आणि स्वप्नांत अन्न अन्न करावयाला लाविले. मला वाटतें आकाशाची चौघडी करता येईल, मेरुपर्वत पुडींत बांधतां येईल, शून्याची नरडी दाबतां येईल, प्रचंड वायाची मोट बांधता येईल, सप्तसमुद्राचा एकच घोट करता येईल, भयंकर वडवानळ प्राशन करतां येईल, पण मनोनिग्रहाची वार्ता भगवंताशिवाय कोणी करूं नये. अहो, प्रत्यक्ष सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव, संहार करणारे श्रीशंकर, आणि प्रतिसृष्टी उत्पन्न करणारे विश्वामित्र अशा अशा बहादरांचे कौपिन मनानें ताडकन्