पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जमातीच्या, विविध प्रांतातून आलेल्या विद्यार्थ्यांशी दोस्ती जमली. बेचाळीसच्या 'भारत छोडो' चळवळीत त्याचे अनेक मित्र सहभागी झाले. परंतु चळवळीत उतरण्याचे धाडस माधवमध्ये नव्हते. चार वर्षापूर्वी वसुधाशी त्याचा विवाह झाला होता. तरीही महत्वाचे निरोप पोचवणे, वेष बदलून भूमीगतपणे काम करणाऱ्यांना काका, मामा बनवून घरी सुरक्षित ठेवणे, अशी कामे तो बिनबोभाट करी. १९४८ च्या फेब्रुवारीत अचानक पोलिस आले आणि माधवला घेऊन गेले. परंतु काँग्रेसमध्ये असलेले गणेश श्रीवास्तव, यशवंत गायकवाड या पुढारी मित्रांना कळताच त्यांनी भरारा चक्रे फिरवली. आठ दिवसाचा तुरुंगवास भोगून तो घरी परतला. तेव्हा मोठा विवेक चार वर्षांचा होता तर धाकट्या नरेंद्राच्या वेळी वसुधा गर्भवती होती.
 २७ वर्षापूर्वीचा तुरूंगवास आठवून आजोबा अस्वस्थ झाले. 'वसुधा १९४८ ची आठवण आहे ना? डॉ.राम मनोहर लोहिया बाईला गूंगी गुडिया म्हणत असत. पण हाती सत्ता आल्यावर 'ही मुकी बाहुली' भलतीच दौडायला लागलीये. ती काय पावलं उचलील याचा अंदाज बांधणं कठीण आहे... 'हरी ओम तत्-सत्' असे म्हणत ते आतल्या खोलीत गेले.
 सोनूला शाळेत सोडण्यासाठी आंजा गेली तेव्हा लाऊडस्पीकर 'माँ तेरे बीसों सपने साकार करेंगे हम' हे गाणे कर्कश आवाजात गात होता. अलिकडे सोनू हेच गाणे बडबडत असते. अशात प्रश्नही खूप विचारते. परवाच आजोबांना विचारत होती की माँ म्हणजे आईच ना? त्यांनी हो, म्हणताच सोनु आंजा जवळ आली आणि प्रश्न केला "मम्मी तुझी वीस स्वप्नं कोणती? आणि स्वप्नं म्हणजे काय गं?" अंकुश, आजोबा, आजी सगळेच तिच्या प्रश्नावर खूप हसले. लगेच दुसऱ्या दिवशी नवी माहिती तिने पुरवली होती.
 'माँ म्हणजे आपल्या भारत देशाची आई. पंतप्रधान इंदिरा गांधी, त्यांची वीस स्वप्ने आम्ही मुलांनी साकार करायचीत. असं मीना दिदी म्हणतात.'

 आजकाल जिकडे तिकडे हेच गाणं वाजतं. मग समारंभ सार्वजनिक सत्यनारायणाचा असो वा मौंज. बँडवालेही हेच गाणं दणादण वाजवणार. आंजा सोनूला शाळेत सोडून येतांना तिथल्या पालकांना थांबायला केलेल्या खोलीतील वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके चाळत असे. अशात, वर्तमान पत्रांतून येणाऱ्या मोर्चे, घेराव, उपोषण, सत्याग्रह इत्यादींच्या बातम्या येईनाशा झाल्यात. नजर खेचून घेईल असा मजकूरच


शोध अकराव्या दिशेचा / ८३