पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नसतो. जिकडे तिकडे स्वयंशासनाचा घोष. आणि, 'इंदिरा इज इंडीया' नारा. सायनच्या झोपडपट्टीत शारदाताई नेहमी येत. त्यांच्या संघटनेचे कार्यालय रेल्वेचा पूल ओलांडून पूर्वेकडे गेले की लागते. त्यांना भेटावसं वाटतं. पण वेळ कसा काढावा? घरात काम नसले तरी आंजा सतत समोर असणे आवश्यक झाले आहे.
 एका सकाळी एक गृहस्थ लाल दिव्याच्या गाडीतून अचानकपणे आजोबांची... माधवराव वझेंची चौकशी करीत आले. त्यांच्यासाठी चहा करतांना त्यांचे बोलणेही अंधुकपणे ऐकू येत होते. संघाच्या कार्यक्रमांना आजोबा जातात का? गुरुदक्षिणा निधी किती देतात? अशा चौकशा करीत होते. घराबाहेर पडतांना त्यांनी आजोबांना निक्षून सांगितले, "आबा, तुम्ही मला ओळखले नाही मी विवेकचा जिगरी दोस्त. मोहन जाधव. गुप्तहेर खात्यात अधिकारी आहे. गांधी खून खटल्याचे काळात तुम्हाला अटक झाल्याचे रेकॉर्ड आहे. सर्व जुनी रेकॉर्डस धूळ झटकून उघडली जात आहेत. काळजी करू नका. मी आहेच. पण कोणत्याही सार्वजनिक सभांना जात जाऊ नका. येतो मी." आणि ते गृहस्थ निघून गेले.
 ते बोलणे ऐकून आंजाला प्रश्न पडला संघ म्हणजे काय? इतिहासात तिने 'बुध्दं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघ शरण गच्छामि' ही प्रार्थना ऐकली आहे. तो संघ महात्मा गौतम बुध्दाचा संघ जगात शांती यावी, दुःख समाजापासून दूर रहावे यासाठी प्रयत्न करणान्यांचा समुदाय होता. मग हा संघ कोणता... हा समुदाय कोणता? मराठवाड्यातील खेड्यात वाढलेल्या आंज्याला हा नवा 'संघ' माहित नव्हता... तिने मनातले विचार दूर ढकलले. आणि कणिक तिंबू लागली.

 अंकुश रात्री उशीरानेच घरी आला. गावाकडून गोविंददादा आले होते. त्यांनी श्रीभैय्यांनाही अटक झाल्याची खबरआणली होती. त्यांना नाशिकच्या जेलमध्ये ठेवलंय. बीड जिल्ह्यातले ऐंशी-ब्याऐंशी लोक तिथे आहेत. पंधरावीस जण येरोड्यात... पुण्याजवळ आहेत. हे ऐकून आंज्याला गोंविददादांना भेटावेसे वाटले. त्यांना भेटायचे तर सोनूचे पप्पा काम करतात तिथे जायला हवे. उद्या तिला शाळेतून सोडून येतांना शारदाताईंच्या कार्यालयात जाऊन यायचे असे तिच्या मनाने ठरवले. सकाळी आजीची परवानगी काढायचे लक्षात ठेवले अंकुशला तिने जतावून सांगितले की ती येईपर्यंत दादांना थांबवून घ्यायचे. गेल्या चार वर्षात गावाकडे जाणे जमले नव्हते. आंज्याला सगळ्यांना खूप-खूप भेटावेसे वाटत होते पण....


शोध अकराव्या दिशेचा / ८४