Jump to content

पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जेवनखाण्याच्या सोयीसाठी मुंबईत रहायचे. तशीच तीन वर्षे पुढे ढकलली. माधव व चिंतामणी सातवी फायनल पास झाले.
 .... आणि मग पणजीबाई, तेंव्हाची जानकी मुंबईत आली. माधव म्हणजे आताचे आजोबा सत्तरीला आले आहेत. मोठा अरविंदा चार वर्षांपूर्वी देवाघरी गेला. त्याचा बारदाणा पुण्यात असतो.
 त्या दिवशी अंकुश संध्याकाळी कामावरून आला, तो थेट आजोबांच्या बैठकीत.
 "आजोबा, वातावरण लईच बेक्कार झालंय. आमचं काम चालू असलेल्या बिल्डींगीच्या समोर मधू दंडवते राहतात. तिथे आज पोलिसांची गाडी उभी होती. ताई आणि नाना, दोघेही श्रम करणाऱ्यांच्या हक्कासाठी भांडणारे. बायाबापड्यांच्या अडचणी सोडविणारे. पण पहाना, पकडून नेले त्यांना. खूप गर्दी जमली होती. पण गर्दी न बोलणारी. का त्यांना पकडून नेताय? त्यांचा गुन्हा सांगा मग अंगाला हात लावा... हा विचार प्रत्येकाच्या मनात होता. पण डोक्याच्या बरणीचं झाकण गच्च बंद केलंय बाईनं. अलिकडे नुस्ता संशय आला, एखादा शब्द वावगा बोलला तरी पकडून नेत आहेत, असे आमचे शिवादादा सांगत होते... हे सारं नवीनच. पण हे ऐकुणही मन उदास होतं" अंकुशने आजोबांजवळ मन मोकळं केलं.
 बाहेरच्या व्हरांड्यातील बंगईवर बसून आजोबा झोका घेऊ लागले. आणि त्यांचे मन मागे मागे जाऊ लागले. १९४८-४९ चा काळ, आजोबांना... माधवला एका व्यापारी कंपनीत अकाऊंटटची उत्तम नोकरी होती. 'बे एक बे' च्या पाढ्यासारखे सारे कसे सुरळीत चालले होते. ३० जानेवारी १९४८ ला सायंकाळी महात्मा गांधीजींची प्रार्थना सुरु असतांना, नथुराम गोडसेनी महात्मा गांधीचा निर्घणपणे खून केला. त्याचे पडसाद भारतभर उमटले, विशेषतः महाराष्ट्रात. सर्वात जास्त परिणाम भोगावे लागले महाराष्ट्रातील ब्राम्हण समाजाला. त्यातही कोकणस्थ ब्राम्हण समाजाला. ती काळ लाट माधवलाही धडक देऊन गेली.

 माधव लहानपणी संघाच्या शाखेत जात असे. त्यावेळी गायवाडीतल्या चाळीत त्यांचे बिऱ्हाड होते. दसऱ्याच्या दिवशी गिरगावातून भल्या सकाळी प्रभात मिरवणूक प्रमुख रस्त्यावरून निघे. सुरवातीच्या बँड पथकात ड्रम वाजवण्याचे काम माधव हौसेने करी. महाविद्यालयात गेल्यावर त्याचा मित्र परिवार रूंदावला. विविध जाती


शोध अकराव्या दिशेचा / ८२