पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपण. दोन चार वर्ष राहतील. नि जातील माघारी. शेत विकलं नाहीये त्यांनी…!" आजोबांनी आपल्या आईची-पणजीबाईची समजूत घातली. त्यानंतर मात्र या विषयाला कधीच आडवाटा फुटल्या नाहीत.

 त्या दिवशी सकाळच्या बातम्यांत इंदिराजींनी देशात आणीबाणी जाहीर केल्याचे कळले. आणि आजोबा काळजीत पडले. त्यांनी अंकुशला इंग्रजी… मराठी, सर्व वर्तमानपत्रे आणायला कोपऱ्यावर पाठवले. गेल्या पन्नास वर्षातल्या विविध आठवणी मनात उसळू लागल्या. जुने दिवस आठवले. वझे कुटूंबाची पावसला चार गुंठे जमीन आहे त्यात भात शेती होती. जुनं कौलारू ऐसपैस घर. अंगणात बारव. गोड्या पाण्याची. आणि भवताली वीस नारळाची, वीस, सुपारीच, चार हापूस नि दहा पायरी आंब्याची झाडं. कोकम, बदाम, केळी, फणस, चिकू यांची चार दोन झाडं. पण घरात दोन भावांचं खटलं. मोठे सावळाराम. म्हणजे आजोबांचे वडिल. त्यांना अरविंद आणि माधव अशी दोन मुले. धाकटे शिवराम त्यांना चार मुली आणि एक मुलगा. घरात माघारी आलेली सोवळी बहिण भागिरथी. दहापंधरा जणाचं कुटूंब, दोहो वेळेला भाजी भाताची सोय होणे अवघड जाई. खाडी ओलांडून रत्नागिरीस जावे लागे. कधी कधी तर घरात आंबे सडून जात. पण रत्नागिरीस पाठवण्याची सोय होत नसे. एक दिवस सावळारामाने मुंबईचा रस्ता धरला. रत्नागिरीस मामाच्या घरी राहून तो चार बुकं शिकला होता. गणितात तरबेज होता. मुंबईत कापड गिरणीत कारकुनाची नोकरी मिळाली. त्याची पत्नी जानकी शेतीकामात हुशार होती. भाताची लावणी पध्दतशीर करी. पोहे करण्याचे कसब तिला होते. कोकमाची अमसुले तर तिनेच करावीत. सावळाराम मुंबईत गेला तेव्हा तिने निक्षून सांगितले होते की ती मुंबईस यायची नाही. तिचा जीव नारळी पोफळीच्या बागेतच पुरलाय. धाकटी जाऊ यशोदा आणि तिचे चांगले मेतकुट जमले होते. घरातील उस्तवारी विधवा नणंद भागीरथी बघे. मग त्या दोघी आंबे, फणस, कोकम यांची उस्तवारी करीत. मुंबईचे चाकरमाने गौरीगणपतीला गावी आले की त्यांचेपाशी आंब्या फणसाच्या पोळ्या, अमसुले, नारळीपाकाच्या वड्या असा सुकामेवा देत. त्यातून मिळणाऱ्या पैशातून पोरांची पुस्तके, कपडे, शाळेची फी थोडीफार निघे. जानकीचा मोठा अरविंद सातवीला गेला. धाकटा माधव आणि यशोदेचा चिंतामणी पाचवीला गेले. मग मात्र सावळारामांनी निक्षून सांगितले की शिक्षणासाठी मुलांना मुंबईस न्यायचे. आणि जानकीने सर्वाच्या


शोध अकराव्या दिशेचा / ८१