पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाजूला पाणी ठेव. आणि मी पलिकडच्या अरूंद गॅलरीतून मागच्या न्हाणीत जाऊन बसतो. एक लाईफबॉय टाक आणि लायसिल नसेल तर पलिकडच्या दुकानातून जनकला आणायला सांग." श्रीनाथने दरवाजा खटखटावून अनूला बाहेर बोलावून विनंतीवजा आदेश दिला आणि तो न्हाणीकडे गेला. दुपारचे दोन वाजून गेले होते. एक रात्र एका युगासारखी.
 श्रीनाथला आलेला पाहून अनूने सुखचा श्वास घेतला आणि गॅसवर गरम पाण्यासाठी पातेली चढवून तांदळाची बरणी खाली काढली.
 २६ जून पासून हवाच बदलली होती. खरं तर हे दिवस पावसाचे. १९७० ते ७२ सतत तीन वर्षे पावसाने तोंड दाखवले नाही. ७३,७४ चा जूनही मनसोक्त आणि धरतीला आतपर्यंत ओलवून टाकणाऱ्या पावसाशिवायच गेला आणि या वर्षी जरा बरसतोय तोच हे नवे संकट. आणीबाणीचे. श्रीनाथ अंतर्बाह्य अस्वस्थ आहे. आणीबाणी यापूर्वीही दोनवेळा घोषित करण्यात आली होती. १९६२ च्या चिनी आक्रमणाचे वेळी आणि १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामाचे वेळी. पण त्या दोनही वेळी बाह्य आणीबाणी घोषीत करण्यात आली होती. परंतु २५ जूनच्या रात्री पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुचनेनुसार राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी "अंतर्गत उपद्रवामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याने आपण आणीबाणी लागू करीत आहोत." असे नमूद केले आहे. चार ओळींच्या त्या वटहुकूमाने कोणाही भारतीयाला विना वॉरंट अटक करण्याचा, नागरी हक्क व स्वातंत्र्य स्थगित करण्याचा अधिकार भारत सरकारला मिळाला. म्हणजे इंदिराबाईना...पंतप्रधान इंदिराजींना मिळाला.
 "अने, तुला २६ जूनचे इंदिराजींचे भाषण आठवते? ते ऐकतानाच तू म्हणाली होतीस बाईच्या आवाजात किती दूरस्थ थंडपणा आहे. मी तुझं म्हणणं चेष्टेवारी नेलं होतं पण हवेतील संवेदनशीलता.. आर्द्रताच हरवली आहे. जो तो संशयाने पाहणारा. बोलू की नको असं घोकत ओठ बांधून बसलेला. आम्ही आज सुटलो तरी उद्याचा भरवसा नाही. तेव्हा मनाची तयारी करून ठेव. आता लढा पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी द्यायचाय. आणि सर्वांनी एकत्र येऊन.

 ... १२ जूनला इंदिराजीविरूध्द निकाल लागला. त्यांची निवडणूक रद्द ठरवली गेली. खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. पण ते तसं घडलं नाही तेव्हाच लोकशाही, स्वातंत्र्य, समता या तत्वांची मृत्युघंटा वाजली. अने मी सतत बाहेर


शोध अकराव्या दिशेचा / ५७