पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असेन. खेड्यातून फिरायचे ठरवलेय आम्ही. तू निर्भयपणे रहा. वाटल्यास जनक, इराला आईबाबांकडे पाठवलेस तरी चालेल. पण मग तू फार एकटी पडशील...."
 एक मुकी शांतता.
....
 "अनू, आज खूप अस्वस्थ आहे मी. वाटतंय तुझ्यावर नि मुलांवर मी अन्याय करत नाही ना? सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष हे आपलं दोघांचं स्वप्न होतं आणि आहे. पण ते स्वतंत्र भारतातलं स्वप्न होतं पण आज वाटतंय दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार. अनूऽऽऽ.."
 बोलतानाही त्याचा स्वर रूद्ध झाला.
 'श्री माझी नको काळजी करूस. मी नोकरी करतेय. ही फार मोठी जमेची बाजू तुझ्या माझ्या पोतडीत आहे. फक्त एकच. घराबाहेर पडतांना दशम्याचटणीची शिदोरी तुझ्या पोतडीत ठेवायची, ओके?'..... श्रीनाथच्या कुशीत शिरत अनू गुणगुणली.
..........  ............   .....
 दुसऱ्या दिवसापासून आण्ण्या, प्रकाश, अशोक, डॉक्टर असे अनेक कार्यकर्ते खेड्यापाड्यातून हिंडू लागले. आणीबाणीचा पट्टा आवळत जाणारा. रोजन् रोज कानगोष्टी सारखी कुजबूज कानावर येई. मधु दंडवते, अटलबिहारी वाजपेयी, मोरारजीभाईंना अटक झाल्याचे कानोकानी इथवर पोचले. वर्तमान पत्रातल्या बातम्यांचा तर प्राणच हरवला होता. नुसती शब्दांची भेंडोळी. एक जुलैला भारताच्या एकानुवर्ती शासन करणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधीनी २० कलमी कार्यक्रम जाहिर केला. रेडिओवर 'मां तेरे बीसों सपने साकार करेंगे हम' सारखी गाणी सतत येऊ लागली. श्रीनाथ, डॉक्टर साहेब, आण्ण्या, बाप्पा देशमुख, अशक्या यांसारखी मंडळी खेड्यापाड्यातून आणीबाणी म्हणजे काय हे सांगत फिरू लागली. उषा, लल्ली, सुशा, सारख्या मुलीही त्यात सामील झाल्या. व्यापारी क्षेत्रातली काही मुलं दूर गेली. 'माझ्या बाबूजींच्या दुकानात आज रात्री सिमेंटची गाडी उतरणार आहे.' असं गुपचूप येऊन सांगणारा, रोज श्रीभैय्या भोवती असणारा जुगल गेल्या आठ दिवसात श्रीनाथ व पक्याकडे फिरकलाही नाही. सायकल मारण्यात पटाईत असलेला शेख्या दिसेनासा झाला. प्रत्येक दिवस खूप उंच न मावळणारा. तरीही अंधारलेला.

 त्या दिवशी रात्री एक वाजून गेला तरी श्री परतला नव्हता. डोळे चुरचुरायला लागले होते. दीडचा टोल शेजारच्या शाळेतील जागल्याने दिला. अनूला कधी झोप


शोध अकराव्या दिशेचा / ५८