पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "भैय्या, जमीनीत पुरलेलं मन अजूनही बाहीर निघत नाही बघा. जमीन विकायला पन मन तयार होत नाही. भैय्या जमीनीचं काय करावं यासाठी तुमचा सल्ला हवा आहे. भैय्या जिमिनीच्या दुरूस्तीसाठी थोडेफार पैसे पन मागे टाकलेत. उन्हाळा सरायच्या आंधी मी तुम्हाला भेटायला येतो. तवर काय तरी विचार करून ठेवा. आंजाही आता मोकळी झालीय. गेल्या साली वझे काकांच्या आई पन खरचल्या. पावसाळयापूर्वी वझेकाकू आणि काका अमेरिकेला जाऊन येणार आहेत. तेव्हा आंजाही निचिंतीने येऊ शकेल इथे"
 नंतरच्या रविवारी देवठाण येल्डा भागात येण्याचे आश्वासन दिल्यानंतर मंडळी उठली. अनू कपबशा आवरीत होती. श्रीनाथ मदत करीत होता, 'श्री बारा वाजून गेलेत. इतक्या दुरुन ही मंडळी तुला भेटायला चालत आली. काही आशा...अपेक्षा मनात घेऊन आली. जेवायच्या वेळेला चहापोहयांवर कटवणं बरं नाही वाटलं मला. निदान भात पिठलं भाकरी तरी करायला हवे होते. पण माझ्या टिपिकल शहरी मध्यम वर्गीय मनाला ते सुध्दा ओझं वाटलं. कष्टाचं वाटलं. श्री मी या परिसरात वाढले असते ना तर कदाचित अशी वागले नसते. नाही का श्री...." बोलता बोलता अनूचा स्वर कापरा झाला. डोळे भरून आले.
 "अने, वेडी की काय तू? अगं पाणी जरी हसतमुखानं दिलंस तरी आपल्या इथल्या माणसांचं पोट भरतं. तू तर स्वतः पोहे करून आग्रहाने खाऊ घातलेस... चल. काहीतरी नको विचार करूस... पण अने आज खूप हल्लकं वाटतंय मला. गेले दोन महिने डोक्यावर नकळत वागवलेला बोजा आज फेकला गेलाय. एक वाट धुक्यातून, डोंगराकडे जाणारी. दिसल्यागत वाटतेय मला.. अरे तुला तर पोहेही उरले नाहीत. चल मी कांदा चिरून देतो. तू भात टाक. मस्त तिखट पिठलं भात खाऊ. इरा जनकलाही भूक लागली असेल..."
 श्रीनाथने अनूच्या हातातला कुंचा काढून घेतला आणि प्रेमाने तिचा शेपटा ओढून तिला स्वयंपाक घराकडे नेले.


शोध अकराव्या दिशेचा / १२६