पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सतरंजी खोलीत अंथरली. आणि सगळ्यांना आत बोलावले. अनूने चार पेले, पाण्याचा हंडा आणून ठेवला होताच.
 'अने चहा टाक आदी. आणि नंतर भलभक्कं कांदे पोहे कर. तंवर आमचं बोलणं होतंय...' स्वयंपाकघरात नजर टाकीत श्रीनाथने सांगितले अन् 'हं. दादा बोला.' अशी सुरवात केली.
 "भैय्या, विलेक्शनचे दिवस कसे भिंगरीवानी भराभरा फिरत व्हते. आता मोरारजी देसाई पंतप्रधान होऊनबी लई दिस झाले. अप्पांच्या कमीनिष्टांनी तुम्ही जंतावाल्यांनी लई आसवासनं दिलीवती. खेड्यांना रोड, डोंगरातल दवाखाना, बॅंक, दहावी पसवर एकांदी साळा, भरघोस वायदे केले. पन एकाची बी सुरवात न्हाई. लोकांनी भरभरून मतं टाकली. आप्पा निवडून बी आले. विलेक्शन होऊन जनता सरकार गादीवर बसून म्हाईना उलटून गेला. आमला बी कळतंया. की पी हळद आन् हो गोरी असं होत नसतं. पन तुमी, आप्पांनी एकादा तरी येवून जायाचं की!
 भैय्या, तुमी अशोकभाऊ, मोहनदादा चव्हाणदादा बप्पा देशमुख दुस्काळात येत होता. तवा पेक्षा एक आना बी परिस्थिती बदलल्याली न्हाई. तवा तुम्ही म्हनाला होता की डोंगराच्या इकासासाठी 'डोंगर इकास समिती' स्थापन करूया, आमचं म्हणणं हाय की त्ये काम आता पुन्ना सुरु करा. कसं?"
 "व्हय ... व्हय. परकासदादा सांगत होते की तुमाले राजकारनात विन्टरेस्ट न्हाई. आप्पां ऐवजी तुमी हुंबं रहावं म्हणून समद्यांनी लई आग्रेव केला. पन तुमाले ती लाईन नकोच हाय असं कळलं."
 "भाऊ, खेड्याकडचं ध्यान दूर करू नका होच सांगाया आलो आमी हितवर" खरात भाऊंनी गोंविददादांच्या बोलण्यात भर घातली. इतक्यात श्रीनाथचे लक्ष अंकुशकडे गेले.
 "अरेव्वा, अंकुश, तु कधी आलास मुंबईहून? कसे आहात सगळे? आंजा, सोनू सगळे मजेत?" श्रीनाथने विचारले.

 "भैय्या आंजा पण आलीय. काका सिरियस असल्याचा फोन आला नि लगेच निघालो इकडे यायला. आंब्याच्या दवाखान्यात आणलं होतं. पण उपेग झाला नाही. शिवादादांच्या कारभारणीकडे सोनूला ठेवलं नि निघालो इथं यायला. तिची परीक्षा जवळ आलीय. काकांना जाऊन पंधरा दिवस झालेत. तुमच्याशी थोडं बोलायचंय" नि तो बोलू लागला.


शोध अकराव्या दिशेचा / १२५