पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिलदार आणि समजुतदार लाभली तर बाईचं भाग्य खुलतं.
 २० मार्च १९७७ रात्र. निवडणूकीचे निकाल धडाक्याने बाहेर येत होते. उण्यापुऱ्या एकोणतीस वर्षांनंतर काँग्रेसची दयनीय पीछेहाट झाली होती. इंदिराजी निवडणुकीत पडल्या आणि रेडीओने गाणे लावले, 'सबेरे वाली गाडीसे चले जाओंगे' निकाल लागत होते. घराघरातील रेडीओंचे आवाज वाढत होते. 'पंछी बनू उडके फिरू मस्त गगनमे... मेरा रंग दे बसंती चोला' या सारखी अर्थपूर्ण गाणी रेडिओवर वाजत होती. घर... रस्ते... माणसे सारीच नाचू लागली होती. गांवातील लोक मुक्तपणे एकमेकांकडे गप्पा मारायला जात होती. झोपलेल्यांना उठवून चहा करायला, तेलतिखट लावून भुंगडा करायला, भजी तळायला लावण्यातली मजा अनेकजण अनुभवत होते. इतके दिवस कोडलेला संताप, उद्विग्नता शब्दांतून उफाळत होती. पण त्याच बरोबर मुक्तीचा, दुसऱ्या स्वातंत्र्याचा आनंद कडकडून मारलेल्या मिठीतून, शब्दांतून ओसंडत होता.
 श्रीनाथने निकालाचा अंदाज येताच पाच किलो पेढे, कांदे, दोन किलो चुरमुरे, शेंगदाणे, चार लिटर दुध आणून दिले.
 'अने, उषा, मनी, लली, हंसाक्कांना बोलावून घे. जिवंत फोडणीचा झक्कास भुंगडा नि केशरी दुध करा. पोरं येतीलच.'
 अवघी उत्तररात्र पहाट होऊन लहरत होती.
 दुसऱ्या दिवशी रेडीओवर बातमी आली, की २४ मार्चला नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार आहे. अशोक, अमन, नरहरी अण्णा, डॉक्टर यांना दिल्लाला जाण्याचे वेध लागले. श्रीनाथ मात्र फारसा उत्सुक नव्हता. अनूला मात्र मनोमन वाटत होते की त्याने जावे. तिला आठवले.
 ...लोकसभा निवडणूकीत श्रीनाथने उभे रहावे यासाठी बन्सीधरने आग्रह धरला होता. अनेकांनी पाठिंबाही दिली होता. श्रीनाथने मात्र शांतपणे ठाम नकार दिला होता. जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ, तळागाळातल्या माणसांसाठी सतत खपणारे, वैयक्तिक लाभाची अपेक्षा न करता ग्रामीण परिसरातील भोवऱ्यासारखे हिंडणारे, सामान्य माणसांचे प्रश्न धसास लावणारे अप्पाच योग्य उमेदवार आहेत. हे त्याने आग्रहपूर्वक श्रेष्ठींना पटवून दिले होते. आणि ती जागा जनता दलाने मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या आप्पांसाठी सोडली होती. सर्वांनीच भरपूर कष्ट घेतले. प्रचार केला आणि आप्पा भरघोस मतांनी निवडून आले.

 अनूची त्या काळातली भाषणे अथांग समुदयायाला प्रभावित करीत. तिच्या


शोध अकराव्या दिशेचा / १२३