पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पण हंसाक्कालाही पहिल्या तीन मुलीच झाल्या. मग मात्र सासूबाई भामाजिजी सुनेला घालून पाडून बोलत.
 "माई परमानं हिला बी पैल्या पाच पोरी होनार. खाण तशी माती... आडातलं पोहोऱ्यात येनारच!!" असे बोलणे ऐकावे लागे. 'ज्याच्या पदरी पाप त्याला पोरी होती आपोआप'. ही म्हण तर उठता बसता ऐकावी लागे. पण उषाच्या पाठीवर प्रभात झाला, भामाजीजींनी नातीची पाठ कुंकवाने माखली. तिचं कावेरी नाव बदलून उषा म्हणायला सुरुवात केली.
 मुलांच्या शिक्षणासाठी राडीकर देखमुखांनी आंब्यात बंगला बांधला. लेकरांना भाकरी घालण्यासाठी, त्यांचा अभ्यास घेण्यासाठी हंसाक्का आंब्याच्या बंगल्यात राही. दीरांच्या चारही लेकीचे लग्न बरावी पास झाल्यावर केले. पण हंसाक्काची रेवती औरंगाबादेत डॉक्टर होतेय. मधली मोहिनी लातूरात वकिलीचा अभ्यास करतेय. हंसाक्काच्या शिस्तीत मुले शिकली. दीरांचे दोन मुलगे पुण्यात सी.ए.करीत आहेत, एक इंजिनिअर होतोय. तिने मुलांच्या शिक्षणासाठी, चांगले वळण लागावे म्हणून घेतलेले कष्ट घर जाणते. प्रभात बारावीला आहे आणि रजत दहावीला. ते एकदा शिक्षणासाठी पुणे औरंगाबादला भरारले की झाले.
 हंसाक्काशी ओळख झाल्यामुळे अनूला मोठी मैत्रिण मिळाली.
 निवडणूका संपल्यावर अनू राडीला जाऊन आली. हंसाक्काच्या आग्रहाखातर धरमबहिणीचे नातेही जोडून आली.
 निवडणुकीच्या रणधुमाळीत अनुराधाच्या अमोघ वक्तृत्वाचे खूप कौतुक झाले. नांदेड, लातूर, उस्मानाबाद भागातील उमेदवार तिच्या सभांसाठी आग्रह धरीत. खरे तर अनू उत्तम व्यक्ती होतीच. महाविद्यालयीन जीवनात मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा तिने गाजवल्या होत्या. गेल्या १० वर्षांत त्यावर गंज चढला होता. निवडणूकीच्या निमित्ताने तो ही साफ झाला... हे सारे आठवतांना तिला हंसाक्काचे शब्द आठवले.

 "अनू आपण खानदेशच्या लेकी. मी काळी म्हणून आणि तू श्रीभैय्यांच्या प्रेमात पडलीस म्हणून इथे आलो. सुरवातीला मला खूप अवघड गेलं. सायकलवरून कॉलेजला जाणारी मी. इथे आल्यावर अंगभर अलवण पांघरून चेहेराही दिसू न देता मी वाड्यात आले. तुळशीचं रोप एकांमातीतून उचलून दुसऱ्या मातीत रोवलं जातं. न कुरकरता ते तिथे रूजतं,... फुलतं... तसंच आपल्या पोरींच्या जातीचं. पहाता पहाता माहेर दूर जातं अन् सासर चहुअंगांनी बहरु लागतं. खरंय ना?...." जोड


शोध अकराव्या दिशेचा / १२२