पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/११२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिरला. अमन ताजातवाना दिसत होता. अर्थात तो मरगळलेला दिसतो कधी? अमन आंब्याच्या समाजावादी गटातला सर्वात तरूण कार्यकर्ता. त्याच्या मनाचं अवकाश नेहमीच नवनव्या प्रश्नांनी, प्रतिक्रियांनी, कल्पनांनी झगमगलेलं असायचं. त्याचा प्रत्येक प्रश्न नवी दिशा शोधण्याचा ध्यास घेणारा असायचा. श्रीभैय्यांना पहाताच अमन उठला. भैय्याला शेजारी बसवीत म्हणाला.
 "भैय्या, तुम्ही आला नसता तर मग मीच आलो असतो तिकडे....
 भैय्या या बंद कारागृहाच्या दगडी भींतीतूनही आता वारे वाहू लागलेत. आहात कुठे तुम्ही? सुधिऱ्या पॅरोलवर चार दिवस जाऊन आला. त्यात दोन दिवस महाबळेश्वरला मधुचंद्रही साजरा करून आला. तो नंदा बरोबर लग्न करणार आहे, हे तर गावरगन्ना माहितच होतं. हा म्हणे सकाळी अंब्यात पोचला की दुपारी २ वाजता देवीमायच्या देवळात जाऊन लग्न लावल नि रात्रीच्या यष्टीने थेट पुणे नि महाबळेश्वर. आता त्याच्या पावलावर पाऊल टाकायला बन्सीधरही उतावळा झालाय. पण मध्ये धोंडा टाकलाय त्याचा खास दोस्तानीच!..." अमनची अपेक्षा होती श्रीभैय्या काही कॉमेंट... प्रतिक्रिया हाणतील. पण श्रीभैय्यांचं अमनच्या बोलण्याकडेही लक्ष नव्हतं. खिडकीतून बाहेर बघत कुठे तंद्री लागली होती कुणास ठाऊक. अमनने श्रीनाथला हलवून भानावर आणले.
 "भैय्या कुठे गेलं मन? थेट आंब्याला की"

मनऽऽ वढाय वढाय
जसं पिकातलं ढोरऽऽ

 अमन गाऊ लागला. आणि श्रीनाथ वैतागला. पण स्वतःच्या वैतागाचाही राग आला. आणि अजीजीने अमनला म्हणाला, "अमन प्लीज गाऊ नकोस बाबा. दगडी भिंतीतून वारे वाहू लागलेत म्हणजे नेमकं काय? बाईच्या मनाचा दगड पिघळायला लागलाय का? बेट्या, त्या सुधिर बन्शाचं 'शाकुन्तल' मला नको सांगूस. तू नि अशक्या आजारी पडा नि सिव्हील हॉस्पीटलला एक फेरा मारून या बरं. म्हणजे खरी माहिती कळेल"

 इथे आल्यापासून गेल्या चारपांच दिवसात त्याच्या लक्षात आलंय की या सतरा महिन्यांच्या बंदिवासाला प्रत्येकजण कंटाळलाय. गेल्या वर्षीच्या थंडीत अंगात रंग होती. बेडरवृत्ती होती. आणीबाणीला टक्कर देण्याची उर्जा होती. पण ह्या वर्षीची थंडी मात्र सहन करणे अवघड चाललेय. अशक्या सांगत होता की एक दिवस नरहरी अण्णा मध्यरात्रीच उठले. आणि तुरुगांच्या दरवाजापाशी जाउन उभे राहिले. त्यांना


शोध अकराव्या दिशेचा / ११२