पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/११३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वप्नं पडले होते की सर्वांची सुटका झालीय आणि तेच गाढ झोपेमुळे एकटेच तुरुंगात अडकले आहेत.
 श्रीनाथच्या लक्षात आले की शर्मा नानाजींच्या चरख्याचा आवाज ऐकू येत नाही तसेच गीतेच्या श्लोकांचे हलक्या आवाजातले गुणगुणणे ऐकू येत नाही. गेल्या सहा सात महिन्यात शर्मा नानाजींच्या सहवासाची सवय झाली होती. १९४२ च्या चळवळीतले, १९३० सालच्या मिठाच्या सत्याग्रहातले अनुभव ऐकण्यात कारागृहातील तरूण मुले रंगून जात. त्यांच्याकडून महात्माजींच्या, विनोबाजींच्या सहवासातल्या आठवणी ऐकणे हा खास अनुभव असे. सांगता सांगता ते मध्येच थांबत. अमन बेटाला पाणी आणायला सांगत. आणि मग ऐकणाराला गुळाचा प्रसाद मिळे. त्यांना भेटायला त्यांची बहुरानी किंवा छुटकी बिटीया येऊन गेली की साखरेऐवजी चुरम्याच्या गुळ घालून केलेल्या लाडवांचा आणि खजुर बियांचा प्रसाद मिळे. अशा नानाजींची उणीव बरॅकमधील सर्वानाच भासत असे. शर्माजींना पाच दिवसा पूर्वीच सुटका झाली होती.
 ठरल्यानुसार अशक्या, अमनचे पोट नि डोके दुखले. चांगला चार तासांचा मुक्काम जिल्हा रूग्णालयात ठोकून येतांना अनेक बातम्या, वर्तमानपत्रे, पुस्तके खाऊ घेऊन आले. तसे तर रूग्णालयात दहाबाराजण रोज जात. जो तो आपापल्या विचारांच्या दिशेने बातम्या गोळा करून येई. आज एक बातमी मात्र सर्वांनी सारखीच आणली होती. ती बातमी अनेकांना उल्हासीत करणारी होती तर अनेकांना अस्वस्थ करणारी. अमनच्या डोक्यात जुन्या आठवणींचे शोभादर्शक यंत्र वेगाने फिरू लागले. जयबाबूच्या सहवासातील ते दिवस.

 १९७४ साली ६ मार्चला बिहारमधे जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा निघाला होता. त्यासाठी अमन आणि प्रकाश बिहारामध्ये गेले होते. जयप्रकाशजी त्यावेळी मुसहरी भागात लोकजागृतीच्या कामाची दिशा, कृतीकार्यक्रम यांवर विचार करण्यात गुंतले होते. मुख्यमंत्री गफूरच्या सत्तेखाली सामान्य माणूस दबला जात होता. सप्तस्वातंत्र्याचा ध्यास घेतलेले जयप्रकाशजी हाच एकमेव आशेचा दिवा होता. त्या अभूतपूर्व शिबीर व मोर्चात सामिल होऊन नवी उर्जा, नवे कार्यक्रम घेऊन अमन, प्रकाश परतले. अत्यंत लहरी, पात्र बदलून हजारो जीवने गिळणारी कासी नदी, अत्यंत सुपीक अशी बिहारची भूमि तिथल्या जमीनदारांच्या उद्दाम वृत्तीच्या सत्यकथा, तिथले अंतहीन...अपार दारिद्रय यांचे जवळून दर्शन झाले होते. परततांना ओरिसा पहायचे ऐनवेळी ठरले. तिथले दारिद्रय, आदिवासींची उपासमार, विलक्षण सुंदर हिरवाई, झाडांनी थबथबलेले डोंगर, उड्यामारणारे झरे, विस्तीर्ण समुद्र किनारा या


शोध अकराव्या दिशेचा / ११३