पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रतापगड उभारणी, मोहनगड दुरुस्ती व उभारणी, रायगडाचे प्रचंड बांधकाम, भूपाळगडासारखा कित्येक किल्ल्यांची डागडूजी व उभारणी, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग (कासा) अलिबाग(कुलाबा), खांदेरी उंदेरी यासारख्या किल्ल्यांची उभारणी ही व काही धरणांची इत्यादी कामे झालेली दिसतात. शिवाजीराजांच्या १६४६ ते १६८० या कारकीर्दीत झालेली एवढी अभियांत्रिकि क्षेत्रातील कामे निदान महाराष्ट्रात तरी इतर कोणत्या काळात झालेली नाहीत.

 निरनिराळ्या अठरापगड जातीजमातींना त्यांचे पिढीजात धंदे किंवा नोकऱ्या करता येऊ लागल्या. सुलतानीत हे सर्वच दडपले गेले होते. वसुलीचा हक्क वतनदार जहागीरदारांच होता. त्यांचे प्राबल्य. बळजोरी आणि आपसातील मारामाऱ्या यांनाच ऊत आला होता. महारांना एरवी वतनदारांच्याकडे नोकऱ्या मिळाल्या तर ठीकच एरवी हालच कारण शेतीचेच हाल चालू. जवळजवळ प्रत्येक किल्ल्यावर देवडीवरचे राखणीचे काम, स्वराज्यातील अनेक ठाण्यांवरचे, मेट्यांवरचे राखणीचे काम महार-रामोशांकडे होते. त्यांना "नाईक" या सन्मानदर्शक संबोधनाने बोलावले जायचे. पाटील, कुलकर्णी या गावकामगारांना त्याचे परंपरागत कामच दिलेले पण वसुलीचे हक्क काढून घेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवलेले होते.

 स्वराज्यात मुलकि अधिकाऱ्यांची संख्याही बरीच होती. हे सर्व पगारी नोकरच होते. यात लेखणीचे काम जास्त असल्यामुळे ब्राह्मण, प्रभू इ. जातीचे लोक होते.रयतेतील लोक मुलखगिरीवर जाणे व मुलूखगिरीवर न जाणारे रयतेच्या व्यवस्थेला लागणे ही व्यवस्था होती. दोन्ही कामांना राजांनी महत्त्व दिले.

 इ.स. १६७० च्या सुमारास जेव्हा औरंगजेबाविरुद्धचा तह मोडून पुन: मोगली सत्ता स्वराज्यातून उचकटून काढायचे काम चालू होते तेव्हा शिवाजीराजाने निळोपंत मुजुमदारांनी गड घेणे इत्यादी मुलूखगिरीच्या कामातून काढून मुलकिचा कारभार करण्याकडे बदली केली. "एकाने सिद्ध संरक्षण करावे, एकाने साध्य करावे. दोन्ही कामे साहेब बरोबरी मानताती" तरीपण शिवाजीराजांनी मुलकि अधिकाऱ्यांना शिरजोर होऊ दिले नाही. प्रभावळीच्या सुभेदाराला एका कामात चुकारपणा केल्यावर त्यांनी खलिता पाठवला होता आणि "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो?" या शब्दात समज दिली होती.

 भूमिचे संरक्षण, भूमिसेवक शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या शेतीभातीचे संरक्षण, शेतकऱ्यांचाच संरक्षणामध्ये संवर्धनामध्ये सहभाग, शेतकऱ्यांच्या शेतीतून आणि बलुतेदारांच्या उत्पादनातून मिळणाऱ्या वसुलीचा संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी होणारा वापर या सर्व गोष्टींना रयत साक्षीदार होती.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ७९