पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मागण्यासाठी आले व राजांनी त्यांना आपल्या सैन्यामध्ये दाखल करून घेतले. हे राजांच्या धार्मिक धोरणाचे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

 राजा धर्माभिमानी होता, विष्ठावंत होता पण अंधश्रद्ध नव्हता. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामाचा जन्म झाला. मुलगा झाला या वार्तेने गडावर जो आनंद व्हावयास पाहिजे होता तो कोठे दिसत नव्हता कारण मूल पालथे उपजले होते. पालथे उपजणे हा त्याकाळी अपशकुन समजला जाई. राजारामाच्या मागे जन्मापासून अपशकुनाचे वलय चिकटले तर प्रत्येक वाईट गोष्टीचे खापर त्याच्या माथ्यावर फोडले जाईल याची जाणीव राजाला झाली. तो म्हणाला, "पुत्र पालथा उपजला, दिल्लीची पातशाही पालथी घालेल." मग हुजरेपाजरे सर्व म्हणू लागले. "थोर राजा होईल शिवाजी राजियाहून विशेष किर्ती होईल." या प्रागतिक धार्मिक धोरणामुळे बजाजीराव निंबाळकर यांचे शुद्धिकार्य, नेताजी पालकर यांचे शुद्धिकार्य इत्यादी शुद्धीकरण होऊ शकले. मात्र भोंगळ पुरोगामीपणाच्या आहारी जाऊन त्याने स्वराज्यातील जनतेच्या भावना दुखावतील असा अतिरेकि उत्साह मात्र कधी दाखविला नाही. स्वत: स्वधर्मीयांबद्दलसुद्धा तो अतिशय कठोरतेने वागे. धर्मक्षेत्रात पूज्य मानलेल्या सत्पुरुषांनी मर्यादेपलीकडे राजकारणात लुडबूड केलेली त्याला अजिबात आवडत नसे.

 चिंचवडकर देवांना त्यांने 'तुमची बिरदे आम्हास द्या व माझी तुम्ही घ्या.' या शब्दात फटकारले आहे. म्हणजे तुम्ही छत्रपती व्हा आणि आम्ही पूजाअर्चा करतो असा याचा अर्थ. हे घडले कोणत्या गोष्टीमुळे? जेजुरीच्या धाडशी व गुरव मंडळीत उत्पन्नाच्या हप्त्याबद्दल भांडण होते. चिंचवडकर देवांना हे समजले. त्यांनी गुरव व धाडशी मंडळींना निवाड्यासाठी बोलाविले. देवांनी धाडशांचे अधिकार गुरवाना देऊन टाकले. विरुद्ध गेलेल्या निकालास भिऊन पळून जाणाऱ्या धाडशांना किल्ल्यात बंदी घातले. चिंचवडकर देवांना वाटले आपण छत्रपतींचे गुरू त्यामुळे हे अधिकार आपोआपच मिळाले आहेत. देवांच्या प्रतिष्ठेमुळे सिंहगडच्या कील्लेदारांनी त्यांच्या आज्ञेचे पालन केले. राजाने सिंहगडच्या गडकऱ्याला फटकारले. परस्पर कोणालाही बंदीत टाकण्याचा तुला अधिकार काय ? चाकर आमचा की देवांचा? पत्र पाहताच धाडशांना सोडून द्यावे लागले. चिंचवडकरांची प्रतिष्ठा व त्यांच्या स्वधर्मियांमधील मान व सन्मान यापेक्षा स्वराज्यातील शिस्त पाळली गेली पाहिजे हा शिवाजीराजांचा दंडक होता.

 राजाने वतनदारांचे परस्परवसुलीचे अधिकार काढून घेतले. तसेच देवस्थानांचे घेतले. चिंचवडकर देवांना बादशाहीतसुद्धा कोकणातून पडत्या भावाने भात, मीठ

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ५२