पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 अवलोकनाचे प्रयोजन


 पुस्तकाचे नाव वाचून अनेक कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटेल. देशातील कोणत्याच राजकीय पक्षाबद्दल मी कधी फारसे बोलतसुद्धा नाही. लिहिणे दूरच राहिले. मग आज मी एका पक्षाविषयी, तेदेखील देशाच्या राजकीय नकाशावरील अगदीच किरकोळ आणि महाराष्ट्रापुरत्या मर्यादित प्रादेशिक पक्षाबद्दल का लिहावयाचे ठरविले आहे?

 मधून मधून शेकापचे काही नेते शेतकरी संघटनेविषयी, व्यक्तिश: माझ्याविषयी कडाडून टीका करतात. मोठ्या प्रमाणावर अशिष्ट भाषाच नव्हे तर खुले आम शिवीगाळ करतात. शेतकरी संघटनेच्या विचारासंबंधी मोठ्या प्रमाणावर प्रकाशित साहित्य आता उपलब्ध आहे. ते निदान डोळ्याखालून घालून, मग तोंड उघडावे इतकी अपेक्षा श्री. उद्धवराव पाटील, प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारख्या अभ्यासू, तपस्वी नेत्यांकडून करावयास हरकत नाही. त्याहीबाबत निराशा झाली तरी तिला वाचा फोडण्याचा विचारही माझ्या मनात आला नाही. जानेवारी १९८३ मध्ये अलिबाग येथे भरलेल्या शेकापच्या १२ व्या अधिवेशनात संघटनेवर अनेकांनी तोंडसुख घेतले. व्यक्तिगत निंदानालस्ती केली. क्वचित जातीय प्रवृत्तीचा दर्प यावा अशीही भाषा वापरली गेली. या अधिवेशनात मंजूर झालेल्या ठरावात वेगवेगळ्या राज्यांतील राजकारणविरहित शेतकरी आंदोलनावर हल्ला चढविण्यात आला, तरी त्याविषयी लिहिण्याबोलण्याची आवश्यकता वाटली नव्हती.

 निरनिराळे पक्ष शेतकरी संघटनेविषयी वेगवेगळ्या भूमिका घेत असतात. चार वर्षांच्या अल्पावधीत शेतकरी संघटित करण्याचे काम देशपातळीवर उभे करण्याचा चमत्कार संघटनेने करून दाखविला, हे कोणीच नाकारू शकत नाही. गावोगाव घडून आलेल्या या अद्भुत प्रकाराने काही पक्ष धास्तावले, काही चक्रावले, काही आनंदले. ज्या पक्षांचे शेतकऱ्यांत काहीच काम नव्हते त्यांना इतर पक्षाचे पाय परस्पर कापले जाताना पाहून आनंद वाटला. संघटनेशी बळेच लगट करून जवळीक साधण्याचा प्रयत्न असे पक्ष करतात, पाठिंबा जाहीर करतात. ज्या पक्षांनी ग्रामीण

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १२४