पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भागात काही चळवळ बांधली होती, कार्यकर्ते तयार केले हाते, त्यांचे सैद्धांतिक प्रशिक्षण करण्याचा प्रयत्न केला होता, ते संघटनेच्या यशाने चक्रावले, धास्तावले, भडकले. अनेक वर्षे त्यांना जे जमत नव्हते ते शेतकरी संघटनेने फटक्यात करून दाखविले याचे वैषम्य त्यांना वाटणे साहिजकच होते. संघटनेचे यश हे त्यांच्या आयुष्यभराचे अपयश होते. सारासार विवेक सोडून, त्यांनी शेतकरी संघटनेविरुद्ध आघाडी उघडली.

 शेकापची गणना मी या दुसऱ्या प्रकारच्या पक्षात करतो. फार नाही तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत शेकापने चांगले काम बांधले होते. विदर्भातही काही गावांतून अचानक शेकापचा एखादा निष्ठावंत कार्यकर्ता पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. संख्येने मर्यादित का असेनात- प्रशिक्षित, निष्ठावंत, त्यागी, तन-मन-धनाची झीज सोसलेले, सोसण्यास तयार असलेले कार्यकर्ते हे 'शेकाप'चे वैभव वाखाणण्यासारखे होते. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 'साहेबांनी पाठीवरून हात फिरवून, 'शेकाप'ला विरघळवले. राहिलेले नेते सत्तेच्या राजकारणामागे लागले. या परिस्थितीमुळे निराश झालेले, वैफल्याने ग्रासलेले पण पूर्वी आयुष्यात मानलेल्या ध्येयाकरिता संधी मिळाली तर 'फिर लढेंगे'चा निर्धार चेहऱ्यावर तळपणारे कार्यकर्ते गावोगाव भेटतात. त्यांचे निराळेपण उठून दिसते. मला तर अगदी हजारोंच्या गर्दीतून हे चेहरे लक्षात येतात. मराठवाड्यात कितीतरी गावी असे चेहरे हेरून, त्यांना मी मुद्दाम बोलावून घेतले आहे किंवा भेटावयास गेलो आहे.

 संघटनेच्या विचारांतील तर्कशुद्धता जाणवल्यामुळे म्हणा, कोमेजून गेलेल्या अशांना संघटनेच्या रूपाने पुन्हा अंकुर फुटण्याचा संभव लक्षात आल्यामुळे म्हणा असे अनेक कार्यकर्ते आज शेतकरी संघटनेचे काम करत आहेत. जागोजाग हे कार्यकर्ते मला भेटतात. रोखठोक प्रश्न विचारतात. आनंद वाटतो.

 शेतीमालाच्या भावाचा प्रश्न शेकापने सर्वांत आधी उठवला होता, शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव मिळावा ही मागणी शेकापने अनेक वर्षांपूर्वी केली होती. त्यासाठी जागोजाग चळवळी केल्या होत्या, आंदोलने केली होती; मग हा प्रश्न उठवण्यासाठी वेगळी संघटना काढण्याची काय आवश्यकता होती?

 शेतीमालाला भाव शेवटी राज्यसत्तेमार्फत मिळवायचा आहे. मग शेतकरी संघटनेस राजकरणापासून अलिप्त कसे राहता येईल?

 शेतीमालाला भाव मिळवण्यासाठी खरेदीविक्री व्यवस्थेची एक यंत्रणा आवश्यक आहे. कापूस एकाधिकार खरेदीप्रमाणे योजना उभ्या कराव्या लागतील, राबवाव्या

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १२५