पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकऱ्यांना देता आली नाही तर तो चांडाळ अमृतराव त्यांच्या मुलांच्या अंगावर उकळत्या कढईतील तेल ओती, तवे तापवून शेतकऱ्यांना त्यावर उभे करी. त्यांना तक्त्यांत पिळीत. शेतकऱ्यांच्या पाठीवर अमानुषपणे मोठमोठाले दगड ठेवण्यात येत. त्यांना ओणवे करून त्यांच्या नाकाखाली मिरचीचा धूर देण्यात येई. त्यांच्या कानांत व बेंबीत बंदुकीची दारू घालवून उडवीत.'

 'सावकार रीतसर दस्तऐवज करून घेऊन ऋणकोच्या मुलांना नि मुलींनाही गहाण लावून घेत... शेतकऱ्यांची मालमत्ता ते केव्हाही गहाण लावून घेत...शेतकऱ्यांची मालमत्ता ते केव्हाही ताब्यात घेत, त्यांच्या डोकीवर वा छातीवर धोंडा ठेवून किंवा त्यांना ओणवे करून पैसे वसूल करीत. क्षुल्लक रकमेसाठी त्यांच्या गुराढोरांचा लिलाव करीत, शेती जप्त करीत, त्यांना विहिरीस मुकवीत.' (महात्मा जोतीराव फुले- धनंजय कीर- पृष्ठ क्र. ४-५)
 एखादेवेळेस कोणी शूद्र नदीकाठावर आपली वस्त्रे धूत असता त्या स्थळी जर एखादा भट आला तर त्या शूद्रास आपली सर्व वस्त्रे गोळा करून, बऱ्याच दूर अंतरावर, जेथून भटाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा येण्याचा संभव नसेल अशा स्थळी जाऊन आपली वस्त्रे धुवावी लागत असे. तेथून जर भटाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा आला, अथवा आला असा खोटा भास झाला तर त्या भटाने अग्नीसारखे रागाने तप्त होऊन जवळचे भांडे त्याचे मस्तक रोखून मोठ्या त्वेषाने मारावे. त्याजमुळे त्याचे मस्तक रक्तबोंबाळ होउन मूर्च्छित होत्साता जमिनीवर धाडकन् पडावे. पुढे काही वेळाने शुद्धीवर येऊन आपली रक्ताने भरलेली वस्त्रे घेऊन निमूटपणे घरी जावे. सरकारास जर कळवावे तर भटशाही पडली. उलटी त्यासच सजा देणार.

  'भटराज्यांत त्यांस व्यापाराच्या अथवा दुसऱ्या गोष्टीच्या संबंधाने फिरणे झाल्यास मारामारी मोठी पडत असे. त्यांतून प्रात:काळी तर फारच अडचण पडे? कारण त्या वेळेस सर्व वस्तूंची छाया लांब पडते आणि अशा प्रसंगी जर कदाचित कोणी शुद्र रस्त्याने जात असता समोरचे रस्त्याने भटसाहेबांची स्वारी येत आहे हे पाहून त्यांच्या अंगावर आपली छाया न पडावी या भीतीस्तव घडी दोन घडी आपला खोळंबा करून रस्त्याचे एका बाजूस होऊन त्यास बसावे लागे... एकादे वेळेस याची छाया भटाचे अंगावर चुकून पडली तर तो भट लागीच त्यास मरेमरेतो मारी आणि ताबडतोब नदीवर जाऊन स्नान करी. त्यापैकी कित्येक लोकांस रस्त्यांत थुकण्याचीही पंचाईत. याजकरिता त्यांस भटवस्तीतून जाणे झाल्यास आपल्याबरोबर धुंकण्याकरिता एकादे भांडे ठेवावे लागत असे. जर त्याचा थुका पडून भट साहेबाने पाहिले म्हणजे त्या मनुष्याने समजावे की आतां आपले पुरे आयुष्य भरले.'

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ११०