पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(गुलामगिरी, पृष्ठ क्र. १२९)
 रस्त्यावर उठलेली पावले पुसली जावीत म्हणून कमरेस झाडाची एक फांदी बांधावी लागे. सर्वसामान्य शूद्रांच्या भावना जोतीबांच्या शाळेत तीन वर्षे शिकलेल्या एका विद्यार्थिनीच्या निबंधात फार चांगल्या तऱ्हेने दिसतात.

  'इमारतीच्या पायांत आम्हास तेलशेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा क्रम चालविला होता. त्या समयी महार व मांग यांतून कोणी तालीमखान्यावरून गेला असतां गुलटेकडीच्या मैदानांत त्याच्या शिराचा चेंडू व तलवारीचा दांडू करून खेळत होते. अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी, तर विद्या शिकण्याची मोकळीक कोठून मिळणार? कदाचित कोणास वाचता आले आणि ते जर बाजीरावांस कळले तर तो म्हणे, की हे महारमांग वाचतात तर ब्राह्मणांनी कां त्यांस दप्तराचे काम देऊन त्यांच्याऐवजी धोकट्या बगलेत मारून हजामती करीत फिरावे की काय? असे बोलून तो त्यांस शिक्षा करी.. हा जूलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येते.'

 पेशवाई संपली, आता इंग्रजांच्या समतावादी, न्यायी राज्याचे फायदे काही हाती पडतील अशा आशेने शूद्र पाहत असता त्यांच्या लक्षात आले की,

 'शूद्रांवर ब्राह्मणांचा कारभार आणि ब्राह्मणांवर इंग्रजांचा कारभार असे या नवीन राज्याचे स्वरूप आहे.' (धनंजर कीर, पृष्ठ क्र. २११)


 सहा


 हे एक राष्ट्रच नव्हे

 शतकानुशतके चालत आलेल्या आर्यभटांच्या अन्यायाचे परिमार्जन इंग्रजांच्या राज्यातही होत नाही. शेतकरी जेथल्या तेथे राहतो आहे. त्याची परिस्थिती उलटी खालावत आहे. याउलट ब्राह्मण अज्ञानी लोकांच्या मनात इंग्रजी राज्याचा द्वेष भरवून जागोजाग मोठमोठी बंडे उपस्थित करीत आहेत. उमाजी रामोशाचे बंड, वासुदेव फडक्याचे बंड, १८५७ ची बंडाळी ही पाहता आपली इतिहासजमा झालेली धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक सत्ता पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नास ब्राह्मण लागले आहेत. अनेक शूद्रही त्यांत सामील होत आहत हे पाहून जोतीबांना चिंता वाटू लागली. इंग्रजी राज्य तर काय कायमचे राहणारे नाही; पण इंग्रज गेल्यांनतर सत्ता कोणाच्या हाती जाणार?

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १११