पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

याशिवय कित्येक ब्राह्मणांस शालजोड्या, कित्येकांस पागोटी, कित्येकांस धोतरजोड्या, कित्येकांस यथासांग वर्षासन देण्याच्या नेमणुका, अशा रीतीने दररोज ब्राह्मणांस यथेच्छ भोजन घालून वर रगड दक्षिणा देण्यांत व बक्षिसे देण्यांत प्रजेस अति दुःख होऊन वसूल केलेल्या पैशाची नासाडी करून टाकली होती.

(इशारा, पान ३१६)

 खेड्यातील भटांना फायदा केवळ वीसच रुपये मिळत असेल, चंगळ शहरातील ब्राह्मणांचीच होती असे धरले तरी त्याबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे, की खेड्यातील भटाला वीस रुपये दक्षिणा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना शेकडो रुपयांचा अनावश्यक खर्च करावा लागत असला पाहिजे. धार्मिक विधींसाठी लागणारी सामग्री, तांदूळ, गहू, खोबरे, खारका, हळकुंड, हळदकुंकू, पान, सुपारी, नारळ, दही, दूध, तूप, तेल, लाह्या, बत्तासे, दुर्वा, फुले, पत्री, रवा, केळी, फळ-फळावळ, साखर काही बिनघामाची येत नाहीत. त्यातील काही वस्तू घरात तयार होत असल्या तरी इतर बाहेरूनच आणाव्या लागतात. वर वेगवेगळ्या प्रसंगाने धोतर, शालजोड्या, लुगडी, पावसाळा असल्यास छत्र्या, हिवाळा असल्यास पांढऱ्याधाबळ्या, उन्हाळा असल्यास पंखे, पायातील जोडे, पागोटी, तांबेपितळ्या, काठ्या, गाद्या, भाजीपाला अशी अनेक दाने द्यावी लागत. याखेरीज प्रत्येक धार्मिक विधीनिमित्ताने छोटा का होईना भोजन समारंभ-निदान तूपपोळ्यांचा तर होणारच. खेड्यांतील भटांचा फायदा वीसच रुपये होता असे गृहीत धरले तरी शेतकऱ्याचा धार्मिक खाती खर्च बराच मोठा असला पाहिजे आणि आधीच अस्मानी सुलतानीने जर्जर झालेल्या शेतकऱ्यास, व्रणावर चोच घालणाऱ्या या कावळ्यांचा उपद्रव जाणवणार असलाच पाहिजे.

 यात गावोगावचे भिक्षुक काही बळजबरी करीत होते असे नाही. त्यांची भूमिका 'नि:संग दांडग्या भिकाऱ्याची- प्रतिष्ठित भीक मागत फिरण्याची' होती हे जोतीबांनीही मानले आहे; पण समाजातील ब्राह्मणांची भूदेवाची प्रतिष्ठा, शेतकऱ्यांची हवालदिल स्थिती आणि अज्ञान पाहता या भीक मागण्यातही एक प्रचंड जबरदस्ती होती.धर्मव्यवस्थेने अज्ञान लादले. ब्राह्मणांनी भूदेवपद स्वत:कडे घेतले. पाऊस, नक्षत्रे, आजारपण, जन्ममृत्यू सर्वांवर आपला अधिकार सांगितला. वेदांतील तिसरा भाग पावसासंबंधीच. 'यज्ञात् भवति पर्जन्यः' व्यवस्थेचा शेतकऱ्यांना धाक असणे साहजिकच.

 पण धर्ममिषाने दक्षिणेची भीक मागणाऱ्या भिक्षुकांचं फळ पै शिवराईची दक्षिणा नव्हती. जागोजाग वेळोवेळी मिळेल तेथे टोचलेला हा शेतकरी कर्जात सापडेल

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १०७