पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि सरकारी यंत्रणेतील ब्राह्मण कामगारांच्या प्रभुत्वाचा यथायोग्य फायदा उठवून, सर्व जमीनच गिळंकृत करता येईल एवढी या भिकेची झेप होती. आज यजमानापुढे विनम्र असलेला पुरोहित भटजी उद्या त्यांच्यापुढे सावकार आणि परवा जमीनदार म्हणून येईल. बळीराजापासून भीक मागून तीन पावले मागून घ्यायची आणि शेवटी त्यालाच गाडून टाकायचे याच इतिहासाचा हा हर खेड्यात दरवर्षी होणारा प्रयोग होता.


 पाच


 सरकार पुन्हा आर्यभटांचेच

 भट कामगारांचे सरकारी खात्यातील प्राबल्य हे शेतकऱ्यांच्या दुर्दशेचे दुसरे महत्त्वाचे कारण जोतीबांनी दिले. 'शेतकऱ्याच्या असूडा'तील दुसरे प्रकरण या विषयाकरिता दिलेले आहे.

  'सरकारी गोरे अधिकारी हे बहुतकरून ऐषारामांत गुंग असल्याने त्यांना शेतकऱ्यांचे वास्तविक स्थितीबद्दल माहिती करून घेण्यापुरती सवड होत नाही व या त्यांच्या गाफीलपणामुळे एकंदर सर्व सरकारी खात्यांत ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असते.' (पृष्ठ क्र. २०३)

 पण हे प्राबल्य केवढे खोलवर रुजजेले आहे! शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, ते अगदी न्याशाधीशाच्या किंवा कलेक्टरच्या समोरील कामांचीही कशी फिरवाफिरव करून शेतकऱ्यास नाडतात; कुलकर्ण्यापासून ते मामलेदारापर्यंत, बांधकाम खात्यापासून ते पाणीपुरवठा खात्यापर्यंत सर्व विभाग त्यांनी कसे व्यापले आहेत यावे वर्णन 'गुलामगिरी'त अधिक विस्ताराने केलेले आहे.

  'ज्या शूद्रांस वाचता आणि लिहिता येत नाही, अशांस कित्येक कुलकर्णी गांठून त्यांचे आपण सावकार होऊन त्यांपासून जेव्हा गहाणखते वगैरे दस्तऐवज लिहून घेतात त्यावेळी ते आपल्या जातीचे लेख लिहून मिलाफी करून त्यांत एक तऱ्हेच्या शर्ती लिहून आणि त्या अज्ञानी शूद्रांस भलतेच काहीतरी वाचून दाखवून त्यांचे हात लेखणीस लावून खते पुरी करून पुढे काही दिवसांनी या कपटाने लिहिलेल्या शर्तीप्रमाणे त्यांची वतने घशांत टाकून ढेकर देत नसतील काय?' (पृष्ठ क्र. १२९)

  '...एकाद्या लंगोटी बहाद्दराने छातीचा कोट करून एखाद्या बुटलेराच्या मदतीने युरोपीय कलेक्टरांस एकांतात गाठून त्याच्यासमोर उभे राहून "माझी दाद लागत

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १०८