पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हिंदूधर्म ही त्यांची विचारांची चौकट. वेदपुराणांतील अगदी बाष्कळ कल्पनांचासुद्धा निषेध नामंजूर. पेशव्यांच्या राजवटीत काही चूक होती, अन्याय झाला हेसुद्धा ते मान्य करायला तयार नाहीत. ब्राह्मणेतरांनी वेद वाचण्याच्या हक्कासाठी भांडू नये; पण ते वंदनीय समजून त्यांतील ब्राह्मण सांगतील तो धर्म पाळावा. या देशाचा इतिहास केवळ उज्ज्वल, अभिमानास्पद. देशाची अवनती झाली ती सामाजिक, राजकीय दोषांमुळे झाली असे नव्हे तर केवळ रहाटगाडग्यांतील गाडगी खालीवर येतात, जातात त्याप्रमाणे 'चक्रनेमिक्रमेण' देश खाली गेला. यथावकाश तो परत उन्नतीस येईल, हा त्यांचा विचार.

 ब्राह्मण हे निसर्गत: श्रेष्ठ असल्याची त्यांची खात्री होती. त्यांची दर्पोक्ती एखाद्या जेत्या सेनापतीला साजेशी आहे.
 आमच्या शूद्र प्रतिपक्षांनी नेहमी लक्षात ठेवावे, की चित्पावन हे चितेपासून जिवंत झालेले असोत किंवा इराणांतून आलेले असोत, त्यांचे नैसर्गिक गुण जे यापूर्वी प्रकट झाले व अद्याप होत आहेत ते छप्पन्न 'गुलामगिऱ्यांनी' व शंभर 'जातिभेदसारांनी'ही लवमात्र कमी होणारे नव्हते. चित्पावनांनी गेल्या शतकांत सारा हिंदूस्थान दणाणून देऊन आपल्या क्षत्रकुलांतक क्षेत्रपतीप्रमाणे दिग्विजय केला व अद्यापही त्यांचे बुद्धिवैभव जसेच्या तसे जागृत आहे. या गोष्टी सर्वजनश्रुत आहेत.(कित्ता पान १०२३)

 एवढा धुत्कार करणाऱ्या ब्राह्मणांबरोबर राष्ट्रातील सकलजनांनी, अगदी शूद्रातिशूद्रांनीसुद्धा परकीय वर्चस्व दूर करण्यासाठी एक व्हावे, झटावे ही तर त्यांची इच्छा होती. यातील विसंगती त्यांच्या ध्यानांतही येत नव्हती. भाषेवर प्रभुत्व; पण ऐतिहासिक, सामाजिक दृष्टीचा पूर्ण अभाव अशी पुण्यातील विद्वानांच्या अग्रणींचीही त्या काळात परिस्थिती होती.

 जोतीबांचे कौतुक हे, की जगाच्या उत्पत्तीपासून ते शेतकऱ्यांच्या दुर्दशेपर्यंतचा त्यांचा विचार हा एकसलग होता. एका धाग्याने विणलेले हे महावस्त्र होते; थातुरमातुर चिंध्यांची गोधडी नव्हती. युरोपीय परिस्थितीत मार्क्स पहिली शास्त्रीय विचारपद्धत उभारीत होता. त्याच वेळी मराठमोळा जोती गोविंद फुले तितक्याच तोलाच्या प्रतिभेने एक संपूर्ण विचारपद्धती मांडत होता. तत्कालीन देशाच्या दुरवस्थेची सुरुवात त्यांच्या दृष्टीने इंग्रजी अमलापासून झालेली नव्हती. हजारो वर्षांचा हा रोग होता. त्या आधीच्या दोन आक्रमणांनीच त्याची सुरुवात झालेली होती.

  'म्हणजे आर्यब्राह्मण व मुसलमान यांपासून प्रजेस (येथे व पुढे प्रजा शब्दाचा अर्थ शूदादिअतिशूद्र लोक समजावा) फारच त्रास उत्पन्न झाला...'

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १०२