पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/106

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गोपाळराव देशमुख आणि वडिलांच्या मर्जीखातर सख्ख्या बहिणीला वैधव्याच्या खाईत होरपळू देणारे आणि प्रौढ वयात अकरा वर्षाच्या मुलीशी विवाह करणारे माधव गोविंद रानडे यांचा ढोंगीपणा जोतीबांत अजिबात नव्हता. जेथे जेथे अन्याय दिसेल, दु:ख दिसेल तेथे पुढे होऊन कामाला सुरुवात करणे हे त्यांचे ब्रीद. स्त्री-शिक्षण, शूद्रातिशूद्रांचे शिक्षण, सत्यशोधक चळवळ या सर्व कामांत त्यांनी सोसलेला विरोध, छळ, दारिद्र्य, जिवावरचा धोका हे सर्व लक्षात घेतले म्हणजे जोतीबांविषयी आदराने मन भरून जाते. प्रत्यक्ष कामाला जुंपून घेतल्यानंतर कामाच्या धडाक्यात जे दर्शन होईल, ते त्यांचे तत्त्वज्ञान होते.

 आर्य ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात विलक्षण घृणा होती; पण त्या ब्राह्मणांतील विधवांची केविलवाणी अवस्था, गर्भपात, भ्रूणहत्या, मृत्यू लक्षात आल्यावर खुद्द पुण्यात ब्राह्मण विधवांना ही अघोर कर्मे करण्याची वेळ येऊ नये म्हणून गुप्तपणे बाळंत होण्याची त्यांनी स्वत:च्या घरी सोय केली. एवढेच नव्हे तर अशाच एका विधवेच्या बाळाची नाळ सावित्रीबाईंनी आपल्या हाताने कापून मुलाला दत्तक घेतले. त्याचे 'यशवंत' नाव ठेवले. त्यांचे विचार पुस्तकी नव्हते. जग समजावून घेणे जितके महत्त्वाचे आहे त्याहीपेक्षा ते बदलणे जास्त महत्त्वाचे आहे. ही समकालीन मार्क्सची उक्ती भारतात जोतीबा प्रत्यक्षात आणत होते. भारतात कृतिशील विचारवंत म्हणून जोतीबांची तुलना फक्त महात्मा गांधींशीच होऊ शकते.


 भारतातील पहिली शास्त्रीय विचारपद्धती

 कृतिशील कार्यकर्त्याचा विचार कामाच्या ओघात आपोआपच स्वच्छ होत जातो. पंडिती लिखापढी करणारा प्रत्येक विषयावर काही जुजबी विचार मांडतो आणि अशा विचारांच्या चिंध्यांची गोधडी बनवतो. वेगवेगळ्या विषयांवरील त्याच्या विचारांत सुसंगती नसते. प्रत्यक्ष रणक्षेत्रात उतरायचे नसल्यामुळे त्याच्या विचारांतील गोंधळ त्याच्या जिवावर बेतण्याची शक्यता नसते. स्वार्थाचे तत्त्वज्ञान शिजवणाऱ्यांच्या विचारांत अशी विसंगती येतेच येते.

 पुण्यातील पंडितवर्गाचे आदरस्थान, मराठी भाषेचे शिवाजी मानले जाणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर हे अशा विसंगतिपूर्ण विचारांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. जोतीबांनंतर पुऱ्या तेवीस वर्षांनी विष्णुशास्त्री जन्मले. घरच्या व्युत्पन्नतेचा, इंग्रजी शिक्षणाचा मोठाच फायदा मिळालेला, ॲडिसन, जॉन्सनसारख्या पट्टीच्या लेखकांच्या शैलीचा कसून अभ्यास केलेला; तरीही विष्णुशास्त्र्यांच्या विचाराला पद्धत म्हणून नव्हती.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १०१