पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैद्य, विद्याधर गोविंद प्रशासन खंड वैद्य, विद्याधर गोविंद संचालक-केंद्रीय गुप्तहेर खाते २५ जुलै १९३६ विद्याधर गोविंद वैद्य हे इंटेलिजन्स ब्युरो ऑफ इंडिया या भारतीय गुप्तहेर संस्थेच्या संचालक पदावर नियुक्त झालेले आतापर्यंतचे एकमेव महाराष्ट्रीयन पोलीस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातल्या बर्‍हाणपूर इथं झाला. गोविंद कृष्ण आणि राधाबाई वैद्य हे त्यांचे आई-वडील अकाली निवर्तल्यानं त्यांचे संगोपन वडीलबंधूंनी केले. मध्य प्रदेशात बंधूंची नोकरी फिरस्तीची असल्यानं त्यांचे शालेय शिक्षण मुख्यत्वेकरून नागपूर, रायपूर आणि जबलपूर येथे मराठी आणि हिंदी माध्यमातून झालं. महाविद्यालयीन शिक्षण नागपूरला झालं. नागपूर विद्यापीठाची संपूर्ण गणित या विषयाची एम.एस्सी.पदवी त्यांनी १९५६ साली सुवर्णपदकासह प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. पदवी मिळाल्यावर १९५६ ते १९५८ या काळात वैद्य यांनी नागपूरच्या सायन्स महाविद्यालयात व्याख्याता म्हणून अध्यापनाचं काम केलं. नोकरी करत असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यु.पी.एस.सी.) परीक्षेची तयारी केली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांची निवड भारतीय पोलीस सेवेत झाली आणि निवृत्त होईपर्यंत ते याच सेवेत कार्यरत होते. पोलीस सेवेच्या आवश्यक प्रशिक्षणानंतर १९५९ साली साहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची पहिली नियुक्ती सुरत इथं झाली. नोव्हेंबर १९५९ ते मार्च १९६२ या काळात याच पदावर त्यांनी पुणे आणि कोल्हापूर इथंही काम पाहिलं. त्यानंतर वैद्यांची केंद्र शासनाच्या गुप्तहेर विभागात प्रतिनियुक्तीवर नेमणूक झाली आणि त्याच विभागाच्या संचालक पदावरून ते निवृत्त झाले. गुप्तहेर खात्याच्या कामाचं स्वरूप नावाप्रमाणेच गुप्त आणि त्याचबरोबर संवेदनशील असल्यानं खास नोंद घेण्याजोगी कामगिरी केली असली तरी त्याची सविस्तर माहिती जाहीर करण्याबाबत प्रशासकीय मर्यादा आहेत. देशांतर्गत सुरक्षा अबाधित राहावी यासाठी देशभरच्या समाजविरोधी घटकांबद्दल गुप्त पद्धतीने माहिती संकलित करून त्यांचा बिमोड करणे हे या संघटनेचे प्रमुख कार्य आहे. सारांशाने नोंद घ्यायची झाली तर देशांतर्गत घडलेल्या अनेक संवेदनशील घटनांसंदर्भात वैद्य यांचं प्रशासकीय प्रक्रियेतील योगदान महत्त्वाचं ठरलं आहे. ‘विविधतेत एकता’ हे खंडप्राय भारतीय समाजरचनेचं खास वैशिष्ट्य आहे. असं असून देखील देशात राजकीय, धार्मिक परंपरा, भाषा, प्रादेशिक अस्मिता, जातिभेद, वर्णभेद, सीमावाद, नद्यांचं पाणीवाटप, दहशतवाद, नक्षलवाद, प्रचंड आर्थिक विषमता आणि इतर अनेक कारणांमुळे अगदी गाव पातळीवरही हिंसाचार उफाळतो, हा अनुभव आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक पूर्व माहिती संकलन आणि घडल्यानंतर त्याची सखोल चौकशी हे भारतीय गुप्तहेर संस्थेचे मुख्य कार्य आहे. हे काम देशभर नेमलेल्या मनुष्यबळाच्या माध्यमातून गुप्तपणे करावे लागते. अशा प्रकारे जमवलेली माहिती व | ३४० शिल्पकार चरित्रकोश