पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धर्माधिकारी, अविनाश भगवंत प्रशासन खंड प्रयोग यशस्विरीत्या राबवला. रत्नागिरी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असताना व पुणे जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी असताना त्यांनी साक्षरता चळवळ विशेषत्वाने राबवली. त्यांनी स्वत: तयार केलेल्या ‘साक्षरोत्तर कार्यक्रमा’ची नमुना कार्यक्रम म्हणून राष्ट्रीय साक्षरता मिशनकडून वाखाणणी झाली.

 भू आणि जलसंवर्धन चळवळ, स्त्री-चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ,  ग्राहक चळवळ, शेतकरी चळवळ अशा अनेक विधायक आंदोलनांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले.
 धर्माधिकारींच्या सेवाकाळात जिथे कारण योग्य होते, तिथे त्यांनी लोकप्रतिनिधींना सहकार्य केले आहे आणि अयोग्य कामे करायला स्वच्छ नकारही दिलेले आहेत. जिल्हाधिकारी म्हणून कार्यकाळ झाल्यावर नोकरीतून बाहेर पडायचे हे आधीच ठरलेले होते. रायगडचे जिल्हाधिकारी असताना त्यानी मतदार ओळखपत्रांचे काम निवडणूक आयुक्त शेषन यांनाही आश्चर्य वाटेल इतक्या वेगाने केले. 
 महाराष्ट्रात सेना-भाजप युती सरकार सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री मनोहर जोशींनी त्यांना आपल्या कार्यालयात नियुक्तीवर मुद्दाम बोलावून घेतले, म्हणून धर्माधिकारींचा  राजीनामा थोडा लांबणीवर पडला. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे काम केलेले होते आणि आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातलाही एक वर्षाचा अनुभव घेतल्यावर त्यांनी मार्च १९९६मध्ये प्रशासकीय (आय.ए.एस.) सेवेचा राजीनामा दिला.
 परिवर्तनाची प्रत्येक लढाई शेवटी राजकीय इच्छाशक्ती नसेल तर फोल ठरते हेच जाणवल्यामुळे त्यांनी राजीनाम्यानंतर राजकारणात सक्रिय व्हायचे ठरवले. १९९८ साली त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली. काळ्या पैशांच्या माध्यमातून चालणार्‍या राजकारणाला आळा घालण्यासाठी म्हणून निवडणूक कायद्यात बदल करण्यासाठी काही ठोस मागण्याही त्यांनी केल्या व त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. ‘माहितीचा अधिकार’ हा कायदा येण्याची मागणी सर्वप्रथम त्यांनीच केली. 
 नागरिकांच्या सबलीकरणासाठी चळवळ उभी केली. नागरिकांची सरकारदरबारची कामे विशिष्ट वेळेत झाली नाहीत तर संबंधित अधिकार्‍याला व्यक्तिश: जबाबदार मानण्यात यावे अशीही मागणी त्यांनी लावून धरली.
 १९८६ सालच्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी म्हणून त्यांनी महाराष्ट्र केडरमध्ये दहा वर्षे काम केले आणि १९९६ साली राजीनामा दिला. १९८६ साली महाराष्ट्रातून निवडले गेलेले ते एकटेच ‘आय.ए.एस.’ अधिकारी होते. 
 राजीनाम्यानंतर त्यांनी १० ऑगस्ट १९९६ रोजी ‘चाणक्य मंडल’ ही शैक्षणिक संघटना स्थापन केली. एक धर्माधिकारी प्रशासकीय सेवेतून बाहेर पडले, पण त्यांनी आपल्यासारखेच अनेक ‘कार्यकर्ते अधिकारी’सुद्धा प्रशासनात पाठवलेले आहेत. युवकांनी प्रशासकीय सेवांमध्ये कोणती मूल्यव्यवस्था घेऊन जावे यासाठी त्यांनी ‘नवा विजयपथ’ हे पुस्तक लिहिलेले आहे. तसेच नागरिकांनी स्वत:चे प्रश्न स्वत: कसे सोडवावेत याबाबतचे मार्गदर्शन करणारे ‘नागरिक’ हेही त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
 मुळात अविनाश धर्माधिकारी हे हाडाचे शिक्षक आहेत. भरपूर वाचन, अभ्यास, स्वतंत्र चिंतन यांच्याच जोडीला अमोघ वक्तृत्व आणि कार्यकर्त्यांची समर्पणवृत्ती ही त्यांची गुणवैशिष्ट्ये अगदी शालेय जीवनापासूनच जतन केलेली आहेत.

- पूर्णा धर्माधिकारी

ध। २० शिल्पकार चरित्रकोश