पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड सीरवाई, होरमसजी माणेकजी मूलभूत संरचना सिद्धान्ताचा (बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन) जन्म झाला. त्यावेळी सीरवाई यांना हा सिद्धान्त मान्य झाला नाही. १९७५ मध्ये देशात आणीबाणी आली. ती अठरा-एकोणीस महिने लागू राहिली. तेवढ्या काळात देशातील कायद्याचे राज्य जवळपास संपुष्टात आले. आणीबाणीच्या काळात घटनेत एकूण पाच दुरुस्त्या- अडतीसावी दुरुस्ती ते बेचाळीसावी दुरुस्ती- करण्यात आल्या. त्यांपैकी एकोणचाळीसावी आणि बेचाळीसावी या दोन दुरुस्त्यांनी घटनेच्या मूलतत्त्वांवर जबरदस्त आघात केले. याच काळात इंदिरा गांधी निवडणूक खटला आणि हेबियस कॉर्पस खटला या दोन खटल्यांत सर्वोच्च न्यायालयाने काही असमर्थनीय असे निर्णय दिले. या सर्वांवर सखोल विचार व चिंतन करून सीरवाई यांनी आपली आधीची भूमिका बदलली. स्वत:च्याच पूर्वीच्या भूमिकेची कठोर चिकित्सा करणारे अतिशय मूलगामी व सूक्ष्म विवेचन त्यांनी ‘द इमर्जन्सी, फ्यूचर सेफगार्ड्स् अँड द हेबियस कॉर्पस् केस : ए क्रिटिसिझम’ या पुस्तकात केले. हे पुस्तक १९७८ मध्ये प्रसिद्ध झाले. केशवानंद भारती खटल्यात आपण सर्वोच्च न्यायालयात केलेले प्रतिपादन केवळ तात्त्विक होते, त्याला वास्तवाचा किंवा अनुभवाचा संदर्भ किंवा आधार नव्हता, परंतु आणीबाणीत देशाने घेतलेला प्रत्यक्ष अनुभव लक्षात घेता, पुन्हा कधी असे घडू नये यासाठी मूलभूत संरचना सिद्धान्त मान्य केला पाहिजे, त्याचप्रमाणे घटनादुरुस्ती करण्याच्या संसदेच्या अधिकारावर काही मर्यादा असल्या पाहिजेत आणि या मर्यादा घटनेतील तरतुदींमध्येच अनुस्यूत आहेत, हेही मान्य केले पाहिजे, अशी नवी भूमिका त्यांनी या पुस्तकात मांडली. त्यांचा हा वैचारिक व बौद्धिक प्रामाणिकपणा आणि स्वत:ची आधीची भूमिका बदलून अगदी वेगळी भूमिका मांडण्याचे त्यांनी दाखविलेले नैतिक धैर्य याबद्दल कायदा जगतात त्यांची प्रशंसा झाली. १९७४मध्ये अ‍ॅडव्होकेट-जनरल पदावरून पायउतार झाल्यापासून सीरवाई यांनी आपल्या ग्रंथाच्या पुढील आवृत्त्यांच्या लेखनास स्वत:ला पूर्णपणे वाहून घेतले होते. प्रत्येक नव्या आवृत्तीत त्यांच्या ग्रंथाचा विस्तार होत गेला. तीन खंड असलेल्या चौथ्या आवृत्तीचे काम त्यांनी आपल्या निधनाच्या आदल्याच दिवशी पूर्ण केले होते. तिसर्‍या आवृत्तीत नव्याने समाविष्ट केलेल्या इतिहासात्मक प्रकरणाचे एक वेगळे छोटे पण महत्त्वाचे पुस्तक ‘पार्टिशन ऑफ इंडिया : लिजंड अँड रिअ‍ॅलिटी’ त्यांनी १९८९ मध्ये प्रसिद्ध केले. १९९४ मध्ये त्याची दुसरी आवृत्तीही प्रसिद्ध झाली. सीरवाईंना अनेक सन्मान मिळाले. भारत सरकारने १९७२ मध्ये पद्मभूषण हा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. १९८० मध्ये त्यांना दादाभाई नौरोजी पुरस्कार मिळाला. १९८१ मध्ये ‘ऑनररी कॉरस्पाँडिंग फेलो ऑफ द ब्रिटिश अ‍ॅकॅडमी’ म्हणून त्यांची निवड झाली. १९८२ मध्ये मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने त्यांना मानद फेलोशिप दिली, तर १९९४ मध्ये इंटरनॅशनल बार असोसिएशन या संस्थेने ‘लिव्हिंग लेजंड ऑफ लॉ’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. सीरवाई यांची तत्त्वज्ञानाची आवड शेवटपर्यंत कायम होती. ‘बाँबे फिलोसॉफिकल सोसायटी’ या संस्थेशी त्यांचा तिच्या स्थापनेपासून घनिष्ठ संबंध होता. ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज’ (पी.यू.सी.एल.) या संघटनेचेही ते एक संस्थापक व काही काळ अध्यक्ष होते. सीरवाईंचे इंग्रजीवरील प्रभुत्व स्तिमित करणारे होते. इंग्रजी साहित्याचा, विशेषत: काव्याचा व शेक्सपिअरच्या नाटकांचा त्यांचा दीर्घ व्यासंग होता. त्यांचे भाषण ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध होत असत. अभिजात पाश्चात्त्य संगीताचीही त्यांना आवड होती. घटनेच्या या सर्वश्रेष्ठ भाष्यकाराचे निधन घटनेच्या सेहेचाळिसाव्या वर्धापनदिनी, म्हणजे २६जानेवारी१९९६ रोजी व्हावे, हा योगायोग विलक्षण होय. - शरच्चंद्र पानसे

शिल्पकार चरित्रकोश १२५ ।