पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नटाने पैलू शोधायचे. प्रयोगाच्या दृष्टीने विचार करायचा. मग अभिनय येतो. प्रेक्षकांना आपलंसं करणं यासाठी नाट्यप्रयोग असतो. ते सारं यातूनच साधतं. रंगभूमीवर बौद्धिक गुलामी कामाची नसते, हे आपण लक्षात घ्यायला हवं. मुळात सारी रंगभूमी एक माध्यम म्हणून जरी तिचा सर्वंकष (Total) विचार केला तरी शिकवण्याची गोष्ट नाही, हे स्पष्ट होईल. ‘सात्त्विक अभिनय' आता इतिहासजमा झाला. रंगभूमीशी प्रत्येकानं आपल्याला जागृत ठेवायला हवं. प्रत्येकानं प्रत्येक क्षण शिकत राहायला हवं. 'रंगसाधना' ‘स्वयंशिक्षणाचं' दुसरं नाव होय. नाटकवाला स्वभावानं साधा, सरळ हवा. तो अप्रामाणिक, कपटी असता कामा नये. आपण आपल्याला खुलं ठेवायलाही हवं. कुणी काही सांगो, विवेक जागा ठेवून काय घ्यायचं, काय नाही, ठरवावं. सारी रंगभूमी खरोखर विनशीलतेच्या पायावरच उभी आहे.

 प्रशिक्षण, पाठ्यक्रम व शिबिरं यात फरक असतो. शिबिरं व्हायला हवीत. त्यातून एक 'रंग बिरादरी' तयार होते. शिबिराची निष्पत्ती नाट्यप्रयोगात व्हायला हवी. प्रयोगाशिवाय प्रेक्षकांशी नातं जुळून येत नाही. असं नातं जुळून येणं, आयुष्यभर पुरणारा अनुभव असतो.

 नाटकाच्या आशयाचं आधुनिक संवेदनेशी नातं असावं. जी नाटके ते ठेवतात, ती तरतात. कमजोर मरतात. 'नौटंकी' संपली. पण 'यक्षगान', ‘जत्रा' जिवंत आहेत. रंगभूमीमध्ये पुनरुद्धारही नसतो. नवनिर्मिती जरूर असते. पुनर्स्ष्टी असते. गरज, मागणीनुसार रंगभूमी आर्थिक दृष्टीने अनुत्पादक आहे. नाटक करून काही पोट भरता येत नाही. खेळ आहे तो आनंदासाठी केलेला. रंगभूमी 'संस्कार' आहे. तो होत असतो, करायचा नसतो. नाटक अमर आहे. मरेल असं वाटत नाही. पूर्वी नाटकात 'आकाशवाणी' व्हायची. आज ‘आकाश भाषण' (Telephonic Talk) आहे. ती रूपांतरित होईल. जोपर्यंत माणूस आहे, तोवर रंगभूमी राहणार. ती नवोन्मेष घेऊन येत राहणार. चित्रपट आले, तेव्हा वाटलं होतं, नाटक संपलं. पण असं झालं नाही. आज दूरदर्शनचं आव्हान उभं ठाकलंय! पण तरी रंगभूमी तरारतेच आहे ना? मुळात ती माणसाची संवेदना, सहजप्रवृत्ती आहे. नाटकातील मानसिक वर्णाश्रम दूर व्हायला हवा. सारेच रंगकर्मी-रंगयात्री, दिग्दर्शक ब्राह्मण, नट क्षत्रिय, पडद्यामागचे शूद्र असं काही नसावं. रंगयात्रा ही लोकयात्रा, लोकोत्सव, लोककला व्हायला हवी.

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/८२