पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्कारगत, विश्वासगत, रूढीगत, शास्त्रगत, परंपरागत जे जे कालबाह्य, विषम, अंधश्रद्धेस खतपाणी घालणारं होतं त्यावर निकराने हल्ला करून ‘धर्म म्हणजे आचार, विचार शुद्धी' हा नवा विचार मांडला. ईश्वर दगडात नसून प्राणीमात्रांत आहे. ईश्वर प्राप्तीसाठी कर्मकांडापेक्षा सदाचाराची गरज त्यांनी पटवून दिली.

 पंधरावं शतक हे सामान्यजनांच्या दृष्टीने अंधानुकरणाचं शतक होतं. ‘बाबा वाक्यं प्रमाणं' ही आचरण रीत होऊन बसलेली. ‘काला अक्षर भैंस बराबर' असलेल्या निरक्षर, अज्ञानी, जनतेचे डोळे, डोके नि धड म्हणजे त्या वेळचा ब्राह्मण, वैश्य नि क्षत्रिय समाज, सवर्ण समाज. शूद्र त्यांचे वर्चस्व जन्मजातच मानायचे. “जन्मा येणे दैवा हाती' अशी मनःस्थिती धारण केलेल्या या समाजात माणसाचं श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व हे जन्मावरच ठरायचं. कबीरांनी जन्मजात श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व ठरविणा-या व्यवस्थेसच सुरुंग लावला. ते विचारत -

 जो तू ब्राह्मन बाह्मन जाया,

 आन बार स्वै क्यों नहीं आया?

 शूद्रांचा जन्म जसा होतो तसाच ब्राह्मणांचाही. मग ब्राह्मण उच्च नि शूद्र कनिष्ठ कसे! संत कबीरांचं वाक्य हे अत्यंत तर्कसंगत विवेचन असतं. त्यांच्या तर्कास तोड नसते. अकारण हल्ला करण्याची त्यांची वृत्ती नाही. पण डोळे झाकून एखादी गोष्ट प्रमाण मानणं त्यांना कधी रुचलं नाही, पटलं नाही-

 हमारे कैसे लहू, तुम्हारे कैसे दूध।।

 तुम कैसे ब्राह्मण पाण्डे, हम कैसे सूद (शूद्र)।।।

 या प्रश्नांना त्या काळातही कुणी उत्तर दिलं नाही. जात, जन्म इत्यादीवर आधारित अंधश्रद्धेवर, विषमतेवर प्रहार करून कबीरांनी समतेचा, मनुष्य समानतेचा विचार, आचार रुजवला.

 समग्र ब्राह्मण वर्ग हा सामान्य जनतेवर शास्त्राच्या आधारे वर्चस्व निर्माण करून आपली निरंकुश सत्ता टिकवू पाहात होता. संत कबीरांनी धर्मग्रंथ, पोथ्या, पंचांग हे सर्व थोतांड असून परस्पर सौहार्दपूर्ण आचारधर्म हाच खरा धर्म असल्याचं समजाविलं. 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' म्हणणाच्या आधुनिक संत साने गुरुजींची शिकवण ही कबीरांच्या नवविचारांवर, नवशिक्षणावर आधारलेली होती, हे खालील दोहा वाचला की लक्षात यायला वेळ लागत नाही-

शब्द सोन्याचा पिंपळ/७२