पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय।

 ढाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होय।।

 म्हणणाच्या कबीरांना शिक्षणाचा खरा अर्थ उमगला होता. अडीच अक्षरं असलेला 'प्रेम' शब्द जो शिकतो, आचरणात आणतो तो शहाणा, तो पंडित ‘पुस्तकी पांडित्य म्हणजे शिक्षण' अशी अंधश्रद्धा धारण केलेल्या समाजास त्यांनी आपल्या नवविचारांनी छेदून अभिनव मूल्यसंकल्पना रुजवली.

 धर्म, परलोक, मोक्ष या सर्वांच्या मुळाशी ईश्वर कल्पना घर करून असते. मनुष्य समाजातील अंधश्रद्धेचा उगम ईश्वरीय संकल्पनेतूनच होत असतो. श्रद्धा माणसास भावुक बनवते तर अंधश्रद्धा निष्क्रिय, हे कबीरांनी पुरतं ओळखलेलं होतं. म्हणून त्यांनी दगडाच्या मूर्तीत देव नसून तो मनुष्याच्या हृदयात सामावलेला असल्याचं समजावलं होतं. ज्या गोष्टीचा कार्यकारण भाव सिद्ध होत नाही, त्यावर विश्वास न ठेवण्याची एक वैज्ञानिक विचारपद्धती कबीरांनी रुजवली. वीतभर दगडाच्या पूजेने ब्रह्मांड व्यापणारा परमेश्वर मिळत असेल तर मी पर्वताचीच पूजा करीन म्हणणारे संत कबीर तर्काच्या निकषावर बुद्धीप्रामाण्यवादीच वाटतात-

 पाहन (पाषाण) पूजै हरि मिलै, तो मैं पूजू पहार (पहाड़)।

 ताते यह चक्की भलि, पीस खाय संसार??

 कबीरांचे काव्य विचार केवळ अंधश्रद्धेवर व्यंग प्रहार करणारे, कोरडे ओढणारे आसूड नसून त्यामागे व्यवहाराची एक दृढ बैठक आहे. उपयोजित आचारधर्म त्यांच्या विचारांचं सूत्र होतं. म्हणून वीतभर दगडाच्या मूर्तीपेक्षा ते पीठ देणाच्या जात्याची पूजा करणे पसंत करतात. जे बोधगम्य नाही ते नाकारायचं धाडस कबीरच करू जाणे. ईश्वरापेक्षाही आपल्या गुरूला झुकतं माप देण्यात कबीरांची ही व्यवहारी दृष्टीच स्पष्ट होते.

 मंदिर, मशिदीत ईश्वर असतो या अंधश्रद्धेपेक्षा जोखडातून जनसामान्यांना मुक्त करण्यासाठी कबीरांनी आपला परमेश्वर हा निर्गुण, निराकार, अनिर्वचनीय असल्याचं सांगितलं होतं. तत्कालीन सर्व धर्मश्रद्धा, कर्मकांड हे ईश्वर, मंदिर, मठ, मशिदीच्या भोवती फिरत असायचे. ईश्वर, मंदिरमशिदीत नसतो. तो माणसाच्या डोळ्यांत, हृदयात सामावलेला असतो, हे सांगण्यामागे प्रस्थापित अंधश्रद्धेला तडा देण्याचीच कबीरांची दृष्टी होती. हृदयात वसलेला परमेश्वर बाहेर शोधणे केवळ मूर्खपणाचे म्हणणारे कबीर आपली वैचारिक स्पष्टताच सिद्ध करतात-

शब्द सोन्याचा पिंपळ/७३