पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
संत कबीर व अंधश्रद्धा निर्मूलन




 पंधरावं शतक हे विदेशी आक्रमकांचं शतक मानलं जातं. मुस्लीम शासकांनी भारतात आपले पाय रोवले होते. धर्मप्रसारासाठी तलवारीचा धाक ही नित्याची गोष्ट झालेली. देशी हिंदू शासक आपल्या परीने विदेशी आक्रमकांशी लढत राहिले खरे, पण त्यांना फारसं यश आलं नाही. त्याची अनेक कारणं होती. एक तर देश विभाजित मनोवृत्तीचा बळी ठरलेला. ब्रह्मवादी, कर्मकांडी, शैव, शाक्त, स्मार्त, जैन, बुद्ध, अष्टदर्शनी अशा विभिन्न चिंतनाचे मतप्रवाह एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाल्यासारखी स्थिती होती. धर्म, जात, पंथ रक्षणाच्या प्रवृत्तीला दुराग्रहाची झालर येऊ लागलेली. सिद्ध, नाथपंथी, हठयोगी यांच्या रूपाने कर्मकांड म्हणजे धर्माचरण असे समीकरण होऊ लागलेले. अशात मध्यममार्गी धर्म चळवळ ही काळाची गरज झाली होती. दक्षिणेत अलवार तर उत्तरेत स्वामी रामानंदांनी या दृष्टीने पारंपरिक धर्मसंबंधी विचार व आचाराला छेद देणाच्या नव्या भक्तिमार्गाचा पुरस्कार करून आंदोलन सुरू केलं. या संतांच्या हयातीत त्यांना फारसं यश आलं नसलं, तरी धर्मसंबंधी नवविचार रुजविण्याचं क्रांतिकारी कार्य त्यांनी केलं. या आंदोलनाला परिणामकारक करण्याचं ऐतिहासिक कार्य संत कबीरांनी केलं. संत कबीरांनी नवा आचारधर्म रुजवला.

 संत कबीर ईश्वरभक्त होते तसे कवी, सुधारक व युगकर्तेही होते. त्यांनी आपल्या काळातील स्थिती हेरून जे त्याज्य आहे त्यावर हल्ला करण्याचं साहस दाखवलं. सामान्य जनता अंधश्रद्ध होती. तिच्या धर्मभोळेपणाचा अवास्तव फायदा घेणारे केवळ हिंद ब्राह्मण, पंडितच होते असे नाही तर मुस्लीम धर्मातील मुल्ला, मौलवी, मुजावरही होते. संत कबीरांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून जातिगत, धर्मगत, वंशगत,

शब्द सोन्याचा पिंपळ/७१