पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कवितेत निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त करतात तेव्हा इतिहास नाकारत एका नव्या भविष्यास लक्ष्य करतात आणि म्हणतात -

 शिवधनुष्याचा महिमा गाणारे

 ते उचलू शकत नाही

 आणि इतिहासात रेंगाळणारे

 इतिहास घडवू शकत नाही

 यातून हा नवा विश्वामित्र नवी सृष्टी निर्माण करू पाहतो, हे स्पष्ट होतं. या नवसृष्टीत ‘मे फ्लाय संस्कृती'स थारा नाही. लक्तर संस्कृतीस तिथं मज्जाव असेल. सत्त्व व रक्तशोषणास तिथं बंदी असेल. विशाल ड्रेनेज (पतनाचे) तिथे वाहणार नाही. लोखंडी हृदयांची तिथे वस्ती नसेल. डांबरी नसा तिथं असणार नाहीत. विकृतीचे बेशरम आवाहन तिथे असणार नाही (जाहिराती). गुडघ्यात मुंडी खुपसून जगण्याचं अरिष्ट निर्माण करणारं कंपल्शन तिथं नसेल. संज्ञाशून्य संस्कृती म्हणजे मे फ्लाय संस्कृती -

 ‘‘मे फ्लाय' ही एका उडणाच्या किड्याची जात आहे.

 त्यांना तोंडही नसते आणि पोटही नसते!

 फक्त विलासी इंद्रिये त्यांना असतात

 रतिक्रीडा हेच त्यांच्या अस्तित्वाचे महाकारण.

 तोंड आणि पोट यांच्यासाठी

 या मे फ्लाय संस्कृतीलाही

 आपल्या हातांनी काही करावे लागत नाही.

 हे वाचताना हा कवी क्रांतदर्शी, भविष्यवेधी होता याची खात्री पटते. कारण शब्द लिहिले गेले तेव्हा जागतिकीकरण' जन्मले नव्हते. ज्या कवी, द्रष्ट्यास काळाची पावले ओळखता येतात तोच भविष्यलक्ष्यी ना? ‘ज्वाला आणि फुले' वाचायचं यासाठी की, ते आपणास जगाकडे पाहण्याची दृष्टी, विचारधारा, संस्कार देतं ती सम्यक असते नि पुरोगामी. ती मानव कल्याणाची असल्याने मूलतःच वैश्विक असते, कारण तिथं छोट्या आडोश्यांना थारा असत नाही.

 हे पुस्तक माझ्या ख-या कमाईची पहिली खरेदी होती. ती लेवून मी जगत आल्याला चाळीस वर्षं उलटली. साठी उलटली तरी बुद्धी पालटली नाही. मूल्य संघर्षांच्या माझ्या जीवनात उद्ध्वस्त करणारे क्षण, प्रसंग आले नाहीत असे नाही. चांगलं काम करताना, जगताना विरोध अटळ असतोच. तो विरोध हीच तुमच्या चांगलेपणाची दाद, पावती असते, असं आता

शब्द सोन्याचा पिंपळ/६१