पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 साम्यवादाच्या वेदीवर हंगेरीचा बळी घेऊन

 हा नरभक्षक संतुष्ट होईल असे वाटले होते

 पण नवसंस्कृतीच्या गप्पा मारणारा हा जुनाच

 नरभक्षक अजून माणसाळलेला नाही.

 पण रणगाड्यांनी स्वातंत्र्य कधी गाडले जाते काय?

 प्रश्न विचारत ते ‘जग मिटल्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही' असे स्पष्ट शब्दांत ठणकावतातही.

 अतिमानव आणि आदिमानव हा वर्तमानाचा खरा संघर्ष आहे, असं बाबा आमटेंना वाटतं. अतिमानवाचे परत फिरणे' कवितेत ते जगातल्या सर्व विचारधारांची चिकित्सा करतात. देववाद, दैववाद, बुद्धिवाद, अस्तित्ववाद सा-यांपेक्षा त्यांना मानवतावादच श्रेष्ठ वाटतो. यातूनही या कवीची वैचारिक बैठक स्पष्ट होते. सुख, सामर्थ्य, सत्ता, सौंदर्य सान्यांचं मानवी जीवनात महत्त्व असतं हे खरं आहे, पण जग संघर्षमुक्त करायचं असेल तर सुताराचं पोरच ते करू शकेल. कारण त्याचं साधेपण हेच त्याचं सामर्थ्य असतं, असं समजावत ते अहिंसेची शिकवण श्रेष्ठ ठरवतात.

 ज्वाला आणि फुले' हे पुस्तक मला एकविसाव्या शतकातील वाचकांनी कोळून प्यायलं पाहिजे, हे अशासाठी वाटतं की, यातील जे काव्य, संगीत, प्रश्न, विचार आहेत ते या काळाला नवं बळ नि दिशा देणारे वाटतात.

 एकोणिसाव्या शतकात आदिमानव गुलाम होता

 विसावे शतक हे त्याच्या मुक्तीचे शतक आहे

 आणि एकविसाव्या शतकात तो जगाला तारणार आहे

 यातला 'तो' म्हणजे ईश्वर नव्हे. एकविसाव्या शतकाचा तारणहार हलधर, शेतकरी, कुष्ठपीडित, दलित, वंचित, उपेक्षित स्त्रियाच आहेत कारण त्यांचे जीवन श्रमसरितेच्या काठावर एक नवी श्रमसंस्कृती, एक नवं श्रमशास्त्र, एक नवं श्रमतंत्र उभारत आहे. ते त-हेत-हेचे सामाजिक कंस काढते होतील, कारण त्यांना हे जग ‘कंसमुक्त' हवे आहे-

 ‘संप्रदायांचे कंस आणि वादांचे कंस

 वर्णीचे कंस आणि वर्गाचे कंस

 राष्ट्रांचे कंस आणि संस्कृतीचे कंस

 माणूस माणूस अलग करणारे छोटे मोठे कंस'

 दाखवत बाबा आमटे म्हणतात तीच कंसमुक्ती आज हवी आहे. बाबा आमटे द्वापर, त्रेता, कलियुगानंतर स्वतःचं कलियुग ‘माझे कलियुग

शब्द सोन्याचा पिंपळ/६०