पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘ऐसा गा मी ब्रह्म'च्या प्रस्तावनेत कविवर्य कुसुमाग्रज यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, आजवरचे आमचे साहित्य हे बव्हंशी पांढरपेशा वर्गातील लेखकांनी निर्माण केलेले आहे. सदाशिव पेठी साहित्य ही डॉ. केतकरांनी वापरलेली संज्ञा अद्यापही सार्थ आहे. ही सदाशिव पेठ अर्थात पुणे शहरापुरती मर्यादित नाही. ती सर्व महाराष्ट्रभर पसरलेली आहे. ती विशिष्ट जातीपोटजातींपुरती संकुचित आहे, असेही मानायचे कारण नाही. ती एक प्रवृत्ती आहे आणि ती सामाजिक जीवनाच्या प्रचलित व्यवस्थेतून निर्माण झालेली आहे. जातिभेदाच्या तटबंदीने एकूण समाजजीवनाचे विविध स्वायत्त प्रांत निर्माण करून या प्रवृत्तीला फार मोठा हातभार लावला आहे. अनेक मर्यादांनी ग्रासलेल्या अशा वाङ्मयाला तोचतोपणा यावा, त्याच्या चतुःसीमांचा संकोच व्हावा यात नवल नाही. वाङ्मय निर्मितीच्या मीमांसा कोणत्याही आणि कशाही असोत, त्याचा विस्तार व्हावा, जीवनाच्या साच्या सरहद्दीपर्यंत त्यांचा संचार व्हावा. कुसुमाग्रजांच्या मराठी काव्यासंबंधीच्या अपेक्षांची परिपूर्ती म्हणजे सुर्वे यांची कविता. ती भेदातीत कविता आहे. ती जाणिवांच्या परंपरागत सरहद्दी ओलांडते. ती नवं मनुष्य जीवन चित्रित करते.

 सुर्वे यांची कविता क्रांतीची खरी. विद्रोह ही तिची पूर्वअट आहे. पण हिंसा ती अनिवार्य मानत नाही. 'थांब' या कवितेमध्ये ते म्हणतात-

 नच जुमानलेस तर खड्ग हाती घेईन

 सज्जना! असा प्रसंग मजवर आणू नको.

 ती मूलतः शांतीची उपासक आहे. नेहरूंबद्दलच्या प्रेमाचं ती प्रतीक! ती नवसंस्कृतीची समर्थक आहे. जुलुमाला सामोरे जात पणतीनं वीज पेटवायची ताकद असलेली सुर्वेची कविता समाज परिवर्तनाचे एक जाहीर आवाहन म्हणून पुढे येते.

 नव संस्कृतीचे व्हा भाट

 गीत गर्जत या मुक्तीचे

 फुलवीत पंख मेघांचे

 दूत होऊ या शांतीचे

 नारायण सुर्वे यांची कविता केवळ भावाकुल नाही. ती कलात्मकही आहे. तिच्या कलात्मकतेचं स्वतःचं असं सौंदर्यशास्त्र आहे. त्या कवितेत चंद्र, सूर्य, तारे येतात. पानं, फुलं येतात. पण त्यांची कविता जगण्यातून येत असल्यानं त्यात उपमा म्हणून बॉयलर, लेथ, पेट्रोल, गोचीड अशी सारी

शब्द सोन्याचा पिंपळ/१२०