पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सुर्वे काव्य : वंचितांचा टाहो



 कवी नारायण सुर्वे यांचा परिचय महाराष्ट्रास करून देताना कविवर्य कुसुमाग्रज म्हणाले होते की, 'सुर्वे हे कामगार जीवनाशी समरस झालेले नव्हे, तर कामगारांचे जीवन प्रत्यक्षात अनुभवणारे कवी आहेत. त्यांचं बालपण हलाखीचं, तरुणपण संघर्षाचं, प्रौढपण प्रतिकूलतेवर मात करणारं तर आयुष्याचं उत्तरायण अस्तित्वाच्या लढाईनंच ठरलं.' सुर्वे एकदा मला म्हणाले होते की, 'मीही आत्मकथन लिहिणार आहे.' 'बाळगलेला पोर' असं नाव घोळवतो आहे. सुर्वे यांनी अस्तित्वाच्या लढाईत मिळेल ती नोकरी केली. गोदी, मिल, ऑफिस, पार्टी, शाळा तसंच मिळेल ते काम केलं नि शिक्षक झाले. त्यांच्या अनुभवाचं आकाश जीवनाचा सारा अवकाश घेऊन आशयघन झालं. त्यांच्या कवितेनं त्यांना समाजशिक्षक केलं. त्या कवितेनं मराठी जाणिवा विस्तारल्या. पोस्टरवाला, खळवाला, शिगवाला, शेतमजूर, गिरणी कामगार, वेश्या, देवदासी, पार्टी वर्कर, लेथवाला, इंजिनात नि बॉयलरमध्ये कोळसा भरणारा फोरमन, गोदी कामगार, सैनिक, नालबंद, ड्रायव्हर, पोर्टर, खाटीक, हातगाडीवाला, क्रेनवाला, हमाल, सोजीर, बावटेवाला, ‘नायकीण' थोडक्यात सर्व वंचितांच्या वेदनांचा टाहो त्यांच्या कवितेत ऐकू येतो. कामगार वस्ती, झोपडपट्टी, चाळ, खोलीत आयुष्य संपल्यावर फ्लॅट, घर त्यांना लाभलं. त्यामुळे त्यांची कविता, पांढरपेशा, मध्यमवर्गीय जाणिवांना मागं सारत अशा अलक्षित, वंचित मार्गाने जात जगणं घेऊन येते. ज्याला जात, धर्माची संकुचित लेबलं असत नाहीत. ती कविता माणसास माणूस म्हणून जगण्याच्या अधिकाराची मागणी करते. जर शक्य झालं तर हृदयपरिवर्तनाने, प्रबोधनाने व तसं झालं नाही तर क्रांतीनेही तो अधिकार मिळवण्याशी ती प्रतिबद्ध आहे.

शब्द सोन्याचा पिंपळ/११९