पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जीवनलक्ष्यी प्रतिमानं येतात अन् त्यांची कविता जगण्याचं अभिन्न अंग बनते. प्रारंभीच्या काळातली ‘बालचंद्र' कविता पाहाल तर तिचं सौंदर्य पारंपरिक चंद्र, आभाळ, तलाव, मेघ यात आढळतं. पोर्टर, शीगवाला, पोस्टरमध्ये तेच सौंदर्य नवं रूप घेऊन माणसाचं जगणं लेवून येतं. त्यातील करुणा आणि क्रौर्याचं द्वंद्व नारायण सुर्वे ज्या सहजतेनं चित्रित करतात, त्यामुळे त्यांची कविता एकाच वेळी कलात्मक होते नि हृदयस्पर्शीही! त्यांची कविता मराठी वाचकांना काही नव्या शब्दकळाही देते. उदा. - झाडझाडोरा, शिटाक, आत्रंग, दुराकणे इत्यादी अशांमुळे त्यांच्या कविता जीवनाचं पोट्रेट होऊन जातात.

 सुर्वे यांचे काव्य एकाच वेळी लोकल असतं नि ग्लोबलही. त्या कवितेत लालबाग, परळ, कोकण असतो. तसं आशिया, आफ्रिका, रशियाही. त्यात नेहरू असतात तसे मार्क्स, केनेडी, नासेर, लेनिनही. तिच्यात खेडे, शेत, पीक असतं तसं रणगाडे, गलबतं, रेल्वेही. ती अन्याय-अत्याचाराचा विरोध करते तसा लुंबासाच्या हत्येचाही. यामुळे एक वैश्विकता घेऊन येणारी ही कविता जाणिवांचा परीघ रुंदावत आकांक्षांचं न संपणारं क्षितिज चित्रित करते आणि म्हणून तिची व्यापकता सिद्ध होते. विश्वाचं गोकूळ, विश्वाचा आधार असं सुर्त्यांच्या कवितेचं स्वरूप आहे.

 शब्दांच्या हाती फुलांऐवजी खड्ग सोपवणारा हा कवी केवळ कामगार नाही तर तो त्यांच्या जीवनाचा किमयागारही आहे. वंचितांच्या जीवनाचा कायाकल्प हे त्यांच्या कवितेचं ध्येय आहे. कवी नारायण सुर्वे यांची कविता ‘रोटी, कपडा, मकान' या मूलभूत गरजांच्या पलीकडे जाऊन आणखी काही हवे आहे म्हणते तेव्हा तिला भौतिकापलीकडचं मध्यप्रवाहात आणणारं सांस्कृतिक जग हवं असतं. वंचितांना समाजमान्यतेची राजमुद्रा देणं तिचा अजेंडा आहे. त्यासाठी ब्रह्मांडास पाठी घालण्यास, सूर्याची लगोरी टिचविण्यासही हा कवी तयार असतो. वंचितांच्या उत्थानाच्या सुवर्ण काळात आपण असू, नसू ती गोष्ट ते गौण मानतात. पण तो उत्कर्ष काल आलाच पाहिजे याबद्दल ते आग्रही असतात.

 - आवडीने रांधलेला भात,

 खावयास मी नसेल घरात

 - हात उंचावून माझी फुले स्वागतास जातील,

 त्या क्षणी मी असेन की नसेल कुणास ठाऊक?

 हा कवी मोठा आशावादी. कितीतरी कवितांत त्याचा जीवनविचार,

शब्द सोन्याचा पिंपळ/१२१