पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



आता अवधारा कथा गहन ।
जे कळा कौतुका जन्मस्थान ।
की अभिनव उद्यान । विवेक तरूंचे ।
ना तरी सकळ धर्माचे माहेर । सज्जनांचे जिव्हार, ।
लावण्यरत्न भांडार । शारदेचे ॥

श्रीशिवछत्रपतींच्या क्रांतिकार्याचा विचार करू लागताच ज्ञानेश्वरांच्या वरील ओव्या मनापुढे उभ्या राहतात. ज्ञानेश्वरांनी त्यांत महाभारताच्या वैभवाचे वर्णन केले आहे. आपण छत्रपतींच्या चरित्राचा अभ्यास केला तर शिवभारताच्या वर्णनातही ही शब्दश्री तितकीच सार्थ होईल हे आपल्या ध्यानी येईल. आणि पंधराव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची भव्य आकांक्षा चित्तामध्ये सामावून घेणाऱ्या महापुरुषाच्या चरित्राचे निरूपण करण्यास पंधराव्या वर्षीच भावार्थदीपिका रचणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या रसिक, अमृत अक्षराहून अन्य शब्द तरी कोठून आणावे ?
 'हिंदवी स्वराज्य' या महासंकल्पाचे जे स्फुरण महाराजांच्या चित्तात झाले त्यानेच सतराव्या शतकापासून पुढचा भारताचा सर्व इतिहास पालटून गेला. पूर्वीच्या काळी हिंदूंची अत्यंत विशाल अशी साम्राज्ये होती. चंद्रगुप्त, अशोक यांच्या साम्राज्यात बलुचिस्तान, अफगाणिस्तान व त्यालगतचा प्रदेश यांचा अंतर्भाव झालेला होता. पुढे शक, यवन, युएची, हूण यांचा पराभव करून त्यांची आक्रमणे मोडून काढणारे पुष्यमित्र, गौतमीपुत्र शातकर्णी, समुद्रगुप्त, श्रीहर्ष यांनीहि हिंदुस्थानात मोठमोठी साम्राज्ये स्थापन केली होती. त्यामुळेच भारतात त्या काळात सुवर्णयुग निर्माण झाले होते. आणि भारती-