पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
वैयक्तिक व सामाजिक

'आपण बोलणे बंद केलेले बरे. कारण तुमची भाषा मला समजत नाही. तुमची विचारसरणी मला अनाकलनीय आहे.'
 मुंबईच्या प्राचार्यांनी ही विचारसरणी अगदी त्याज्य ठरविली असली तरी ती आज सर्वत्र मान्यता पावली आहे व आचरली जात आहे असे आपल्याला आढळून येईल. जाळपोळ, खून, बलात्कार असले गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना गुन्हेगार समजू नये तर त्यांना रोगी समजावे असे नवीन शास्त्र आहे. गेल्या पन्नास-साठ वर्षात गुन्हेगारीच्या शास्त्राचा खूपच विकास झाला असून अनेक शास्त्रज्ञांनी हे मत आग्रहाने मांडले आहे. मनुष्य हा काही जन्मत: गुन्हेगार नसतो. परिस्थितीमुळे तो गुन्हेगार होतो. त्याला खायला अन्न मिळत नसते, तो दारिद्र्याने गांजलेला असतो, त्याच्या वासना काही कारणाने अतृप्त राहतात, त्या तृप्त करावयास त्याला साधन नसते, संयमाचे शिक्षण त्याला मिळालेले नसते, घरची परिस्थिति मोठी उद्वेगजनक असते, त्याला कोणी- माता, पिता, गुरू- असा योग्य मार्गदर्शक मिळालेला नसतो, म्हणून तो गुन्ह्याला प्रवृत्त होतो. अशा वेळी त्याला शिक्षा न करता त्याला रुग्णालयात पाठविणे हेच इष्ट होय. काही शरीराचे रोगी तसे हे मनाचे रोगी. त्यांना मानसिक रोग्यांच्या आलयात पाठवावे, असे हे नवे मत आहे.
 ही विचारसरणी, हे नवे शास्त्र शिक्षणक्षेत्रात तर फारच मान्यता पावले आहे. विद्यार्थ्यांना काही शिक्षा करणे हे आता अगदी रानटीपणाचे मानले जाते. अनेक विद्यार्थी व्रात्य, खोडकर असतात. गुंड, मवाली असतात. अभ्यास करीत नाहीत. घरी दारी उद्धटपणा करतात; तरी त्यांना शिक्षा करणे हे योग्य नव्हे. अशा वेळी शिक्षकांनी त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहावे. त्यांच्या मनाचा सखोल अभ्यास करावा. त्यांच्या घरची परिस्थिति समजून घ्यावी. कोणाला आई नसते. कोणाला भाऊबहीण नसतात. हे नातेवाईक असले तरी ते त्याच्याशी प्रेमाने वागत नसतात. अशी एक ना अनेक कारणे विद्यार्थ्यांच्या या अपप्रवृत्तीच्या मागे असतात. म्हणून त्यांच्या अपकृत्यासाठी त्यांना जबाबदार धरताच येणार नाही ! त्यांच्या भोवतालची परिस्थिति हीच याला जबाबदार असते. तेव्हा ती सुधारण्याचा प्रयत्न करणे, तिच्यातील उणीवा भरून काढणे हे इष्ट आहे. शिक्षा करणे हे अगदी गर्ह्य होय. नवे शास्त्र असे आहे.
 बऱ्याच लोकांना अजून हे शास्त्र मानवत नाही असे दिसते. एलिझा-