८
तेव्हां रा. पेंढारकर यांस लिहून आह्मी विचारले की, औरंगाबाद येथें रहाण्याची वगैरे
व्यवस्था त्यांच्याकडून होणें शक्य आहे किंवा कसें ? त्यांनी त्याचें होकारासह उत्तर
पाठविले आणि समक्ष भेटीची परवानगी मागितली. आह्मी ती दिली. त्याप्रमाणें ते
औंधास आले आणि आम्हाला भेटले.
रा. पेंढारकरांनी सर्व व्यवस्था करतों ह्मणून सांगितले. परंतु दरम्यान रा.
किर्लोस्करांचा आणि त्यांच्या औरंगाबाद येथील एजंटाचा पत्रव्यवहार होऊन त्या
एजंटांनीही आमची सर्व व्यवस्था उत्तम ठेवतों ह्मणून त्यांस पत्र लिहिले होतें. व त्यांकडे
आह्मी पाहुणे ह्मणून जावें असाही त्यांनी किर्लोस्करांमार्फत आह्मांस आग्रह केला होता.
यामुळे " तुझी औरंगाबाद येथें किर्लोस्करांवे एजंट यांस भेटा आणि त्यांच्या आणि
तुमच्या विचाराने आमच्या पार्टीनें कोठें उतरावयाचें वगैरे ठरवा " असें आह्मी पेंढार-
कर यांस सांगितलें.
पेंढारकर यांनी आह्मास औरंगाबादेहून एक दिवस पैठणास येऊन जाण्याचा
मात्र आग्रह केला. कारण त्यावांचून बरें दिसणार नाहीं असे ते ह्मणाले. आणि तेही
खरेंच होते. शिवाय श्रीनाथमहाराज आणि श्रीशिवदिनकेसरी यांच्या जागा आणि
अत्यंत प्राचीन व सत्पुरुषांच्या वास्तव्यानें पवित्र झालेले पैठण क्षेत्र एकवार पहावें असें
आमच्याही मनांत आले. याप्रमाणे औरंगाबादच्या मुक्कामाची सर्व व्यवस्था झाली.
वेरूळ येथे रहावयास निजाम सरकारचे बंगले आहेतच. त्यामध्ये आपल्या
हिंदू तऱ्हेची स्वयंपाकाची भांडीकुंडी मिळणे शक्य नाहीं; ह्मणून पैठणाहून अगर औरंगा-
बादेहून भांडी वगैरे आणवून त्या मुक्कामाचीही व्यवस्था रा. पेंढारकर यांनीच पहावी
असा आम्ही त्यांस हुकूम केला.
पैठण निजामच्या राज्यांत; अजंठाही निजामच्या राज्यांत; तेव्हां अजंठा येथेही
आमची सर्व तऱ्हेची सोय पेंढारकर यांनीच पाहिली पाहिजे असेही आह्मी त्यांत सांगितलें.
रा. रघुनाथ वासुदेव कुर्लेकर या नांवाचे गृहस्थ जळगांव येथे पोलीस प्रॉसिक्यूटर आहेत. त्यांचे वडील रा. वासुदेव बळवंत कुर्लेकर यांनी औंध संस्थानची नोकरी चाळीस वर्षांवर केली आणि शेवटी मामलेदार असतांना दोन वर्षांपूर्वी पेनशन घेतली. रा. रघुनाथराव कुर्लेकर हेही ऑध येथील हायस्कुलांतील विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांच्यावर