पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘या सीमांना मरण नाही' 'वसुंधरेचा पुत्र', 'श्रम सरितेच्या तीरावर' सारख्या कविता लक्षात येतात. आदिमानव उठला आहे' मध्ये ते अण्वस्त्रांचा प्रश्न हाताळतात. सांगाड्यांचं शहर'मध्ये औद्योगिकीकरणातील भयावह स्थितीचे वर्णन आहे. 'एक खिंड मी लढवीन' मध्ये निवृत्तीनंतरही समाजकार्य प्रवृत्त राहण्याचे जेष्ठ नागरिकांना आवाहन आहे.

 येथे नांदतात श्रमर्षी, या भूमीला क्षरण नाही
 येथे ज्ञान गाळते घाम, विज्ञान दानवशरण नाही
 येथे कला जीवनमय, अर्थाला अपहरण नाही
 येथे भविष्य जन्मत आहे, या सीमांना मरण नाही.

 असे आनंदवनाचे वैशिष्ट्य ते नोंदवतात. ह्या ओळी वाचताना आपल्याला निष्क्रियतेची जाणीव होते. श्रम, जिद्द, अभाव, उपेक्षा यांचे वरदान ज्यांना लाभते, तेच काही करू शकतात. यातनाहीनांना पुरुषार्थ करता येत नाही. ‘अधिक करायचे तर (आधी) अधिक सोसावे लागते’ सारखी सुभाषितं ही केवळ शब्दांची फेक नसते. तर संघर्ष भोगण्यातून उडालेल्या त्या ठिणग्या असतात. त्या क्रियाशीलतेचा वन्ही प्रज्वलित करतात.

 दुस-या महायुद्धानंतर त्याच्या भीषण परिणामानंतर आपण अण्वस्त्रांचे कारखाने उभारत राहिल्याचे शल्य एक संवेदनशील कवी म्हणून व सजग सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना सतावते. जग पंचखंडी न राहता ते द्विखंडी झाले. एक श्वेत खंड, तर दुसरे अश्वेत... कृष्ण... काळे खंड... म्हणजे सारे अविकसित, विकसनशील जग. विशेषतः आफ्रिका, आशिया, शस्त्रशक्तीवर प्रगत राष्ट्रे नि:शस्त्र, गरीब देशांना गुलाम बनवू पाहतात. ‘आदिमानव उठला आहे' कवितेत त्यांचे आंतरराष्ट्रीय राजकारणांचे आकलन लक्षात येते. ‘ग्रस्त स्वातंत्र्यास सलामी' ही कविता झेकोस्लोव्हाकियावरील रशियाच्या आक्रमणावर आहे. साम्राज्यवादाचा पराीव करण्यासाठी जन्मलेल्या कम्युनिस्ट राजवटींनी आक्रमक होणं हे पंचशील प्रमाण मानणाच्या बाबांना अस्वस्थ करतं. त्याचा प्रखर विरोध करताना ते म्हणतात,

 ‘साम्यवादाच्या वेदीवर हंगेरीचा बळी घेऊन
 हा नरभक्षक संतुष्ट होईल असे वाटले होते
 पण नवसंस्कृतीच्या गप्पा मारणारा हा जुनाच
 नरभक्षक अजून माणसाळलेला नाही.

 पण रणगाड्यांनी स्वातंत्र्य कधी गाडले जाते काय?' असा प्रश्न विचारत ते ‘जग आता मिटल्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही' असे ठणकावून सांगतात. अतिमानव आणि आदिमानव हा वर्तमानाचा खरा संघर्ष आहे, असे बाबा

वेचलेली फुले/१७१