पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साहित्याप्रमाणेच त्यांचे चित्रपटही संस्कार, मूल्ये, आदर्श प्रबोधन, इत्यादींची पाठराखण करीत होते.
गृहस्थ जीवन
 अविनाशच्या जन्मानंतर (१९३६) ६ ऑगस्ट, १९३७ ला कन्या मंदाकिनीचा जन्म झाला. तिला बाळलेणे द्यायचे म्हणून वि. स. खांडेकरांनी आपल्याला मिळालेलं गोहर मेडल मोडले. चित्रपट व शाळा यांची कसरत त्यांना जमेनाशी झाली; कारण चित्रपटाच्या कामासाठी वारंवार कोल्हापूर, पुणे, मुंबई असा प्रवास करणं जिकिरीचं झाले; म्हणून खांडेकर सपरिवार सन १९३८ च्या प्रारंभी कोल्हापुरी आले. त्यांनी शाहूपुरीतील मास्टर विनायकांच्या बंगल्यात आपलं बिऱ्हाड थाटले. आजच्या राजारामपुरीतील कन्येनं बांधलेल्या नंदादीप' निवासस्थानी कायमचे राहण्यास येण्यापूर्वी खासबाग इथे मूग यांच्या घरी, नंतर राजारामपुरीत ‘मुक्ताश्रम' येथे खांडेकर राहत. या काळात त्यांना कल्पलता (१९३९), सुलभा (१९४१) आणि मंगल (१९४४) या कन्यारत्नांचा लाभ झाला. खांडेकरांचे आपल्या मुलांवर प्रेम होते. आपलं लेखन, वक्तृत्व, संपादन, संमेलने, चित्रपट या सर्वांतून वेळ काढून मुलांवर संस्कार करणे, शंकासमाधान, गोष्टी सांगणे खांडेकर आवर्जून करत.

 गृहस्थ जीवनाचे संस्कार वि. स. खांडेकरांवर आजोळी असल्यापासूनच होत राहिले. त्यांचे वडील अकाली निवर्तले. त्या काळातही पोरवयातील खांडेकर आपल्या अर्धांगवायू झालेल्या वडिलांची सेवाशुश्रूषा करीत. आल्या-गेल्याचं स्वागत हे त्यांच्या समाजशील स्वभावातच होतं. जे घरी तेच दारी. मित्रांना सदैव मदत करीत. मित्रही त्यांना मदत करायचे.विद्यार्थ्यांवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांचा मनुष्यसंग्रह मोठा होता. त्यांत साहित्यिक, साहित्यप्रेमी यांचा समावेश मोठा होता. त्यांच्या चेहऱ्यावर व्यथेचं चिन्ह कधी उमटत नाही. बोलण्यात कधी दुःखाचा उद्गार नाही. सगळं सोसायचं. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेत राहायचं, ही वृत्ती. ते सोशिक होते. गृहस्थ धर्म पाळणारे होते. इतरांपेक्षा अधिक सहनशील होते. लेखन करताना आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या टाळल्या, असे त्यांच्याकडून कधी झाले नाही. मुले, मुली लहान असताना ताप यायचा. खांडेकर सहासहा तास मुलींना खांद्यावर घेऊन शतपावली करीत, औषधोपचार करीत. प्रसंगी लेखन बाजूस सारत. लेखनिकाला सुट्टी देत; पण मुलांचे करण्यात कुचराई करीत नसत.

वि. स. खांडेकर चरित्र/२७