या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ही आहे.
नाशिकच्या शहरात वस्ती झाली गं रेटून । रामाच्या पायरीला गंगा चालली खेटून ।। रामाचे दर्शन चार महिने ते दुरून । गंगा तुझे पाणी पडे सांड्याच्या वरून ।। अल्याड नाशिक पल्याड पंचवटी । मधून चालली गंगा शिरजोर मोठी ।। अल्याड नाशिक पल्याड कोण गावू । रामलक्ष्मण नांदती दोघं भाऊ ।। अल्याड नाशिक पल्याड तुझं काय । 'राम' माझे भाऊ 'सीता' भावजय ।। नाशिकच्या शहरात कशाचा गलबला । रामजीच्या आधी रथ गरुडाचा आला ।। सीताला सासुरवास ऐका मंदोदरी बाई । वनवास आला पापी रावणाच्या पाई ।। सीता शोधीला मारुती गेला रंगानी । रामाच्या मुद्रक सीतेला हिंगानी ।। रागट सीतामाई कुंकू कपाळी भरून । राम देखीले दुरून, आले नेत्र भरून ।।'
नाशिक जिल्ह्यातील लोकसाहित्य हा लोकसंस्कृतीचा अमोल ठेवा आहे. काळाच्या प्रवाहात हे लोकसाहित्य विस्मृतीच्या कोशात जात आहे. हा मौलिक वारसा जपणे गरजेचे आहे. डॉ, रा.चिं. ढेरे म्हणतात त्याप्रमाणे, वस्तुनिष्ठेच्या निकषावर अस्सल विश्वासार्ह साधनातून उभा राहणारा इतिहास हा शुष्क, रुक्ष आणि चैतन्यहीन होण्याचा धोका असतो म्हणून या लोकपरंपरेशी सर्वच संशोधकांची, रसिकांची जवळीक आणि संपर्क असणे आवश्यक आहे. त्यातूनच नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासाचे दर्शन घडू शकते.
***
नाशिक : वनवासी लोकसाहित्य
५७