Jump to content

पान:विवेकानंद.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

स्थितीत कांहीं काळ लोटल्यानंतर ही व्यक्तावस्था संपून अव्यक्तदशेस आरंभ होतो. ज्या क्रमाने में सारे विश्व प्रथम उत्क्रांत झाले त्याच्या उलट क्रमानें तें अपक्रांत होऊ लागते. स्थूल रूपाचे पृथक्करण होऊन ते आधकाधिक सूक्ष्म होत होत शेवटी आकाशरूप धारण करते. त्याचप्रमाणे विश्वांत अनेक प्रकारे दृश्यमान् होणाच्या शक्तीचेही आवरण होत होत ती आपल्या मूळच्या प्राण-- रूपांत प्रवेश करते. अशा रीतीने ही अव्यक्तस्थिति कांहीं काळ राहिल्यानंतर तिच्या समावस्थेत बिघाड होऊन नव्या कल्पास आरंभ होतो व सर्व विश्व पुन्हां पूर्वीच्या कल्पाप्रमाणे स्थूलरूपाने प्रतीत होऊ लागते. विश्वाची मूलद्रव्ये जौं प्राण आणि आकाश या दोहोंचेंहि मूळ आधष्ठान महत् हे आहे. कल्पारंभापूर्वी प्राण आणि आकाश ही दोन्ही या महत्तत्त्वांत लीन असतात. महत्तत्त्वांतून प्राण आणि आकाश ही नवीन निर्माण होत नसून महत्तत्त्वच या दोन रूपांनी प्रतीत होते. कल्प आणि विश्वाची उत्पात्त याबद्दल आह्मा आयची उपपत्ति कोणत्या प्रकारची आहे हे यावरून आपल्या लक्ष्यांत येईल. ।
 आतां मन, आत्मा आणि परमात्मा यांबद्दल ज्या कल्पना प्रचलित आहेत त्यांचा विचार करू. या त्रयीबद्दल जगांत जितक्या प्रकारच्या उपपत्ति अस्तित्वांत आहेत त्या सर्वास कमी अधिक प्रमाणाने सांख्यदर्शनाचा आधार आहे. सांख्यदर्शनाचे महत्व अशा रीतीने सर्व तत्त्ववेत्त्यांस कबूल असल्याने सांख्यदर्शनाचे मत या बाबतीत काय आहे याचा प्रथम विचार करणे इष्ट आहे.  आपल्या इंद्रियद्वारा बाह्य जगाचे ज्ञान आपण करून घेतों त्यावेळी त्या क्रियेंत तीन निरनिराळ्या क्रियांचा अंतर्भाव झालेला असतो असे सांख्यांचे मत आहे. उदाहरणार्थ, आपण पाहण्याची क्रिया करतो त्यावेळी बाह्य वस्तूचे चित्र प्रथम आपल्या डोळ्यांवर चित्रित होते. या बाह्य डोळ्यास करण अशी संज्ञा आहे. या बाह्य करणाच्या पाठीमागे एक दृग्ज्ञानतंतु (optic nerve ) असून त्याचा गोलक त्याच्या पाठीमागे मेंदूत आहे. या गोलकास व ज्ञानतंतूस इंद्रिय असे नांव सांख्यांनी दिले आहे. बाह्य वस्तूचे ज्ञान होण्यास करण आणि इंद्रिय यांचा संयोग होणें अवश्य आहे. यांपैकी एखादे साधन निष्क्रिय झालें तर बाह्य वस्तूचे ज्ञान होणार नाहीं. बाह्य वस्तूचे ज्ञान होण्यास या दोन साधनांशिवाय तिस-याहि एका क्रियेची अपेक्षा असते. त्याकरितां मन आणि इंद्रिय यांचाहि संयोग होणे अवश्य असते. करण आणि इंद्रिय यांच्या