पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



लोकसंख्येची वाढ व नियमन.



 सन १७९८ मध्ये माल्थस नावाच्या पंडिताने लोकसंख्येवरील आपला ग्रंथ प्रसिद्ध केला. व त्याने विचारी लोकांना लोकसंख्येसंबंधींच्या एका भयानक प्रश्नाची जाणीव करून दिली. त्याने सांगितले की जमिनीतून उत्पन्न होणाऱ्या अन्नवस्त्राला मर्यादा आहे. दहाच्या ऐवजी वीस माणसे तेवढ्याच जमिनीत खपली, व त्यांनी साधनसामुग्री दुप्पट वाढविली, तर पूर्वीच्या दुप्पट अन्नवस्त्र निर्माण होते, हे खरे; पण विसाच्या ऐवजी तीस खपली तर तिप्पट उत्पन्न होईल हे खरे नाही. कोठे तरी याला मर्यादा पडतेच. व मग जास्त श्रम किंवा खते यांचा उपयोग होत नाही. जमिनीच्या या स्वभावामुळे नवीन जन्माला आलेला मनुष्य आपल्यापुरते अन्नवस्त्र निर्माण करू शकणार नाही. व अशा रीतीने अन्नाचा तुटवडा पडत जाईल. ज्या मानाने प्रजेची वाढ होते, त्या मानाने अन्नवस्त्राची वाढ कधीच होणे शक्य नाही. प्रजा भूमितिश्रेढीने वाढते, तर अन्न, गणितश्रेढीने वाढते. तेव्हा लवकरच आता अशी वेळ येईल की माणसांना खावयास अन्न नाही. ही आपत्ती टाळण्यासाठी लोकसंख्येचे नियमन करणे अत्यंत आवश्यक आहे.
 मागल्या काळी रोगराई, दुष्काळ इत्यादी आपत्तीमुळे लोकसंख्येवर नियंत्रण पडे. व शिवाय अनेक देशांतील लोकांत बालहत्त्येची चाल अगदी सर्रास चालू होती हल्ली विज्ञानाने माणसांना पहिल्या दोन आपत्तींपासून बचावले आहे. व बालहत्त्येची चाल तर कायद्यानेच बंद केली आहे. त्यामुळे व गेल्या शतकांत उत्पादनाची यांत्रिक साधने वाढल्यामुळे प्रजावाढीस मर्यादा राहिली नाही. व काही देशांतील संख्या पाच पाच पटीने वाढली. १८०१ साली इंग्लंडची संख्या सुमारे ९० लक्ष होती ती १९२१ साली तीन कोटी अठ्याहत्तर लक्ष झाली. विचारी लोकांचे याकडे पन्नाससाठ वर्षांपूर्वीपासून लक्ष गेलेले आहे. व संततिनियमनाची चांगली साधनेही अलीकडे सापडली आहेत. त्यामुळे पूर्वीची नियमने जरी बंद झाली तरी या नव्या उपायांनी लोकसंख्येच्या वाढीस आळा बसू लागला.
 पण या नवीन पद्धतीमध्ये एक फारच मोठा दोष लोकांना दिसू लागला.